नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरात आलेले गुलाब चक्रीवादळ आणि त्यानंतर काही दिवसातच त्याचे शाहीन चक्रीवादळात झालेले रुपांतर सर्वांनी काही दिवसांपूर्वीच अनुभवले. मात्र, आता याला काही दिवस उलटत नाही तोच आता पुन्हा नव्या चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने तशी माहिती दिली आहे.
उत्तर अंदमानच्या सागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून, त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. दहा ऑक्टोबरला हा बदल होणे शक्य असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली. हे चक्रीवादळ ओडिशाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओडिशाच्या नागरिकांना ऑक्टोबर हा महिना कठीण जाणार असल्याची चिन्हे आहेत.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, दहा ऑक्टोबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची पूर्ण शक्यता आहे. ते दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या दिशेने सरकू शकते. ऑक्टोबर हा महिना सायक्लॉन मंथ म्हणजेच चक्रीवादळाचा महिना ओळखला जातो. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बहुतांश चक्रीवादळ याच महिन्यात ओडिशाच्या किनार्यांवर आदळले आहेत.
या जिल्ह्यांना इशारा
नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मॉन्सूनची माघार आणि चक्रीवादळाच्या हालचाली पाहता आयएमडीने ९ ऑक्टोबरला सकाळी साडेआठ वाजेपर्यंत इशारा जारी केला आहे. सुंदरगढ, बारगढ, झारसगडा, संबलपर, देवगढ, अंगुल, मयूरभंज, कयोनझर आणि बालासोर, मलकानगिरी, कोरापूट, नवरंगपूर, रायागढ, कालाहांडी, कंधमाल, गजपती आणि गंजम या जिल्ह्यांना शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
ऑक्टोबरमध्ये आलेली चक्रीवादळे
२९ ऑक्टोबर १९९९ मध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे पारादीपजवळ भूस्खलन होऊन दहा हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता. फेलिन, हुदहुद आणि तितली चक्रीवादळ अनुक्रमे २०१३, १४ आणि १८ मध्ये आली होती. या वर्षी सप्टेंबरमध्ये आलेल्या गुलाब चक्रीवादळामुळे ओडिशा आणि आंध्र प्रदेशचे अनेक जिल्हे प्रभावित झाले होते.