नवी दिल्ली – लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडण्याचा आरोप असेलेला केंद्रीय मंत्र्यांचा पुत्र आशिष मिश्रा याला अद्याप अटक झालेली नाही. त्याच्या घराबाहेर पोलिसांनी नोटीस चिकटवल्यानंतर आणि दोन समर्थकांना अटक केल्यानंतर आता आशिष मिश्रा पोलिसांसमोर हजर राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तो कुठे आहे याबाबत त्याचे निकटवर्तीय काहीही माहिती देत नाहीयेत. आशिष हा बनवीरपूर या त्याच्या गावात असल्याचे लखीमपूरचे ग्रामस्थ सांगत आहेत. तर काही ग्रामस्थांच्या मते तो लखीमपूरमध्येच आहे. त्याचा फोन बंद असून तो आपल्या घरी आणि व्यावसायिक ठिकाणीही दिसला नाही.
तिकुनियामध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारानंतर केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचे पुत्र आशिष मिश्राविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आशिष मीडियासमोर आला होता. आपल्यावर खोटे आरोप लावल्याचा दावा त्याने सोमवारी पत्रकरांशी बोलताना केला होता. घटनेच्या वेळी तो तिकुनियामध्ये नव्हता, असा दावा केला. आशिषच्या म्हणण्याला भाजप कार्यकर्ता सुमीत जयस्वालनेही दुजोरा दिला आहे. सुमीतनेसुद्धा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा मंगळवारी रात्री दिल्लीला गेले. त्यानंतर मोनू अर्थात आशिष मिश्रा मीडियासमोर आलाच नाही. बुधवारपासून तो कुठेच दिसला नाही. गुरुवारी पोलिसांनी त्याच्या घराबाहेर नोटीस चिकटवली असून, शुक्रवारी सकाळी दहा वाजता पोलिस ठाण्यात बोलावले आहे. तेव्हा आशिष नेमका कुठे आहे यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. घराबाहेर नोटीस चिकटवण्याची अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली, याचे उत्तर त्याचे समर्थकही शोधत आहेत.
परंतु आशिषचा पत्ता कोणालाच ठाऊक नाही. तसेच पुढे तो कोणते पाऊल उचलणार आहे याबद्दलही कोणाला माहिती नाही. घहाबाहेर नोटीस चिकटवल्यानंतर त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. नोटिशीत कोणत्याही कायदेशीर कारवाईबाबत लिहिलेले नाही. त्याला पोलिसांसमोर हजर राहण्यात कोणतीही अडचण नसावीू. परंतु त्याच्या अटकेसाठी पोलिसांचा हा प्लॅन असू शकतो, असे त्याच्या समर्थकांच्या एका गटाचे म्हणणे आहे.