इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही भारतीय नागरिकाला शिक्षण, तीर्थयात्रा, पर्यटन, व्यवसाय, औषधोपचार आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याच्या उद्देशाने परदेशात जाण्यासाठी प्रवासा दरम्यान पासपोर्ट हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आवश्यक आहे. खासगीकरण, उदारीकरण, उद्योग व्यवसाय, वाढती अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाच्या प्रसारामुळे गेल्या काही वर्षांत पासपोर्ट आणि संबंधित सेवांची मागणी वाढली आहे. सेवांची ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, परराष्ट्र मंत्रालयाने मे २०१० मध्ये पासपोर्ट सेवा प्रकल्प सुरू केला.
पासपोर्ट सेवेच्या मदतीने पासपोर्ट आणि संबंधित सेवा वितरणाची प्रक्रिया सुलभ आणि सोपी झाली आहे आणि पारदर्शकता आली आहे. या प्रकल्पांतर्गत पासपोर्टशी संबंधित सरकारी अधिकारी, अर्जदारांच्या तपशिलांची पडताळणी करण्यासाठी राज्य पोलीस आणि पासपोर्ट वितरणासाठी भारतीय पोस्ट यांना एकाच नेटवर्क अंतर्गत एकत्र जोडले गेले आहे जेणेकरून देशभरातील पासपोर्ट जारी करण्यासाठी त्यांच्यामध्ये समन्वय स्थापित केला जाऊ शकतो.
केंद्र सरकार लवकरच भारतीयांसाठी बायोमेट्रिक पासपोर्ट सुरू करणार आहे. त्याला ई-पासपोर्ट म्हणूनही ओळखले जाईल, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव, संजय भट्टाचार्य यांनी सांगितले. सरकारकडून ट्विट करून यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. अशी पासपोर्ट सेवा असलेल्या निवडक देशांच्या यादीत भारताचा समावेश होईल, असा सरकारचा दावा आहे.
बायोमेट्रिककरिता फिंगरप्रिंट आणि बायोमेट्रिकचा वापर केला जाईल. टाटाची कंपनी टीसीएस ई-पासपोर्ट बनवणार आहे. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ई-पासपोर्ट छापण्याचे आणि जारी करण्याचे पूर्ण अधिकार सरकारला असतील. पासपोर्टमध्ये बोटांचे ठसे आधीच वापरले जातात. फिंगरप्रिंट देखील बायोमेट्रिक्सचा एक भाग आहे.
बायोमेट्रिक पासपोर्ट हे चिप सह सक्षम पासपोर्ट असतील. त्यावर नागरिकांना बायोमेट्रिक डेटा टाकावा लागेल. पासपोर्ट रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) द्वारे डेटा ट्रान्सफर करण्याची परवानगी देणार नाही. यामुळे ते पूर्ण-प्रूफ सुरक्षित असेल. बायोमेट्रिक पासपोर्टची संकल्पना २०१७ मध्ये आली. या चाचणीच्या आधारावर २० हजार डिप्लोमॅट्सना बायोमेट्रिक पासपोर्ट जारी करण्यात आले आहेत. हा पासपोर्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर वैध असेल.
हे होतील फायदे
– सध्याच्या पासपोर्टपेक्षा ई-पासपोर्ट अधिक सुरक्षित असतील.
– ई-पासपोर्ट बायोमेट्रिक डेटा साठवतील. अशा स्थितीत पासपोर्ट हरवल्यास
ई पासपोर्टधारकाला फारशी अडचण येणार नाही.
– ई-पासपोर्टधारकाचा विमानतळावर जास्त वेळ वाया जाणार नाही.
– ई-पासपोर्टची बनावटगिरी रोखण्यास मदत होईल.
– त्यामुळे प्रवाशांचे इमिग्रेशन जलद होण्यास मदत होईल.
– ई-पासपोर्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त लोगोसह येईल.
सध्या पासपोर्टसाठी अर्ज घरबसल्या करता येतो. यासाठी तुम्हाला पासपोर्ट सेवा पोर्टलला भेट द्यावी लागेल. याकरिता कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल, पासपोर्ट काढण्यासाठी तीन प्रकारची कागदपत्रे आवश्यक असतील. यामध्ये रहिवासाचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा आणि नॉन-ईसीआर श्रेणीसाठी कागदपत्रांचा समावेश आहे.