त्र्यंबकेश्वर – आषाढ वद्य अमावस्या अर्थात दीप अमावस्या त्र्यंबकेश्वर व परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. दीप अमावस्या म्हणजे दिव्याची आवस. तिला आषाढ अमावस्या किंवा गतहारी अमावस्या (गटारी नव्हे) असेही म्हटले जाते. हिंदू संस्कृतीतील सर्व सण हे कृषीप्रधान निसर्ग महात्म्य सांगणारे आहेत. त्याचप्रमाणे निसर्गातील प्रत्येक घटकांप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करणे आहेत. त्यासाठीच ते साजरे केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे दीप अमावस्या अर्थात गतहारी अमावस्या होय.
चातुर्मास हा संपूर्ण पावसाळाभर असतो. पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे जड अन्नपदार्थ पचण्यास अवघड असतात. श्रावणा आधीचा आहार म्हणजेच जड आहार. म्हणजेच गतआहार. हा आहार या अमावस्येपासून बंद करून हलका आहार घ्यावा असा शास्त्रार्थ आहे. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यापासून सुरु होणाऱ्या सर्वच सणवारात दीप प्रज्वलन महत्त्वाचे असते. त्यामुळे या दिवसाला दीप अमावस्या असे म्हटले जाते.
यानिमित्ताने ठिकठिकाणी घरातील सर्व ठेवणीतले दिवे, समई, निरांजन हे घासून पुसून स्वच्छ करण्यात आले. त्यासोबत कणिक दिवे बनवून पाटावर मांडण्यात आले. त्यानंतर हे सर्व दिवे प्रज्वलित करण्यात आले. ठिकठिकाणी दिव्यांभोवती विविध रंगांची व फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. घरातील सदस्यांनी दिव्यांची मनोभावे पूजा केली. दिव्याची कहाणी ऐकून दिव्याची आरती करण्यात आली. या दिव्याप्रमाणेच आपल्या आयुष्यातील चेतना आणि स्फूर्ती प्रज्वलित रहावी अशी कामना करण्यात आली. देवासह दिव्यांना गोडधोडाचा नैवेद्य दाखवण्यात आला.