इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमध्ये संगीताला खूपच महत्त्वाचे स्थान आहे. अनेक चित्रपटातील गीते ही संगीतामुळेच ख्यात झालेली आहेत. त्याचबरोबर अनेक संगीतकार देशभरात प्रसिद्ध झालेले असून यात काही मोजक्याच संगीतकारांचा समावेश आहे. जगभरात नाव कमविणारे असेच एक भारतीय संगीतकार आहेत ए.आर. रहमान. त्यांचे संगीत नेहमीच वेगळे मानले गेले आहे. आज त्यांच्या जीवन प्रवासाविषयी आपण जाणून घेणार आहोत.
ए आर रहमान यांचा जन्म 6 जानेवारी 1966 रोजी तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे झाला. त्यांचे वडील आरके शेखर हे मल्याळम चित्रपटांचे संगीतकार होते. ए आर रहमान यांचे खरे नाव दिलीप कुमार आहे. ए आर रहमान यांनी धर्मांतर करून आपले नाव बदलले आहे. त्यांच्यासाठी अनेक प्रसंगी ही बाब चर्चेची ठरली आहे. घरातील संगीतमय वातावरणामुळे ए आर रहमान यांनी वयाच्या चौथ्या वर्षी पियानो वाजवण्यास सुरुवात केली. परंतु नशिबाने ए.आर. रहमान यांना लहानपणापासूनच संघर्षाच्या वाटेवरून चालावे लागले आहे. त्यांचे वडील आरके शेखर यांचे वयाच्या 43 व्या वर्षी निधन झाले.
वडिलांच्या निधनानंतर घराची सर्व जबाबदारी ए आर रहमान यांच्या खांद्यावर आली. अशा परिस्थितीत ए.आर.रहमानने अभ्यासासोबतच वडिलांची संगीत उपकरणे भाड्याने देणे सुरू केले. मात्र रहमानच्या आईने हे उपकरण विकण्यास नकार दिला. कारण तिला वाटले की, ते आपल्या मुलाच्या करिअरसाठी उपयुक्त ठरेल. वयाच्या 16 व्या वर्षी, रहमानने संगीत असाइनमेंटसह त्याचा अभ्यास सुरु ठेवला. यावेळी रेकॉर्डिंग सत्रादरम्यान संगीतकारांना मदत करणे, की बोर्ड वाजवणे आणि अन्य वाद्ये वाजणे यासह अभ्यास करीत असे. मात्र, अभ्यास सोडून संगीतावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला आईने त्यांना दिला. एक वेळ अशी आली की, ए.आर. रहमानला एकाचवेळी शाळा आणि काम दोन्ही करणे अशक्य झाले. एके दिवशी तो त्याच्या आईकडे गेला आणि तिला सांगितले की, त्याला दोघांपैकी एकाची निवड करायची आहे. ए आर रहमानच्या आईने त्याला शाळा सोडून संगीतावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले.
ए आर रहमान नंतर यांनी परदेशात शिक्षणासाठी भरारी घेतली. तेथे त्यांनी अत्याधुनिक संगीताचे धडे घेतले. जेव्हा ते परदेशातून भारतात आले तेव्हा ते प्रोग्रामिंगमध्येही तज्ज्ञ बनले. कॉम्प्युटरद्वारे संगीत बनविण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले. ९०च्या दशकात जेव्हा कॉम्प्युटर नुकतेच आले होते तेव्हा रहमान हे कॉम्प्युटरद्वारे संगीत बनवित.
बॉलिवूडमध्ये मणिरत्नम यांनी रहमानला पहिला ब्रेक त्यांच्या ‘रोजा’ चित्रपटात दिला. यामुळेच तो मणिरत्नमचा खूप आदर करतो. त्याला ओळखणारे मान्यवर सांगतात की, मणिरत्नम ही एकमेव अशी व्यक्ती आहे जी रहमानला स्वतःच्या इच्छेने कधीही भेटू शकते.
ए.आर. रहमानने भारतीय चित्रपटसृष्टीत संगीताला नवीन आयाम दिले आहेत. ए आर रहमानने त्याच्या कारकिर्दीत एकदा ऑस्कर पुरस्कार, चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दोन अकादमी पुरस्कार, दोन ग्रॅमी पुरस्कार, एक बाफ्टा पुरस्कार आणि एक गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला आहे. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय संगीतकार आहेत.