इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारताशी नेहमी वाकड्यात शिरणारा आणि दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला नक्की कशाची खुमखुमी आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. देशांतर्गत एवढे प्रश्न असताना अन्य विषयातच पाकिस्तानला रस असण्याची वेगवेगळी कारणे आहेत. आर्थिकदृष्ट्या कंगाल बनलेल्या पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खानने अखेर एका गोष्टीची कबुली दिली आहे. ती म्हणजे, पाकिस्तानवरील कर्जाचा डोंगर आणि महागाईमुळे मला रात्री झोप लागत नाही. रात्रभर जीव तगमग करतो, असे इम्रानने म्हटले आहे. यासाठी इम्रानने मुख्यतः कोरोनाला जबाबदार धरले आहे. तसेच आपल्या देशातील जनता प्रचंड महागाईला तोंड देत असल्याचे त्याने मान्य केले आहे.
पाकिस्तानमधील आर्थिक संकटाची स्थिती पुन्हा एकदा समोर आली. दैनंदिन अन्नाची अत्यावश्यक गरज असलेल्या वस्तूच्या किंमतही येथे खूप जास्त आहे. वाढता महागाई दर, परकीय चलनाचा साठा कमी होत चालला आहे, सरकारी वित्त खात्यातील तुटीवरचा वाढता दबाव आणि पाकिस्तानी चलन ‘रुपया’ची बिघडत चाललेली परिस्थिती यामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानमध्ये तेलाच्या किमतीत अभूतपूर्व वाढ झाली होती. तर सप्टेंबरमध्ये मोहरमच्या काळात कराचीमध्ये दूध १४० रुपये लिटरने विकले जात होते, तेव्हा पेट्रोलचे दर ११३ रुपये होते. दरम्यान, पाकिस्तानच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार न दिल्याचे प्रकरण समोर आले होते. तसेच दक्षिण आशियाई देशांच्या स्थितीचे वर्णन करणारी आकडेवारी या संपूर्ण प्रदेशात पाकिस्तानचा महागाई दर सर्वाधिक असल्याचे दर्शवित आहे.
देश विकासासाठी सरकारला कर्ज घ्यावे लागते. कर्जातून बाहेर येण्यासाठी पुनः पुन्हा कर्ज, असे चक्र सुरू राहते. आपल्या शेजारील देशाचे देखील सध्या असेच झाले आहे. आधीच कर्जामुळे हैराण झालेल्या पाकिस्तानच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी इम्रानने सौदी अरेबियाकडून ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. मात्र पाकिस्तानला हा निधी ४ टक्के व्याजदराने मिळाला आहे. सध्या पाकिस्तान हा देश अती चलनवाढ कमी होत चाललेला परकीय चलन साठा, चालू खात्यातील वाढती तूट आणि घटते चलन मूल्य यासह वाढत्या आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे. इम्रानने एका कार्यक्रमात देशाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याची कबुली दिली. सरकारकडे देश चालवण्यासाठी पुरेसे पैसे नसणे हेच आमच्या समोर सर्वात मोठे आव्हान आहे, असेही त्याने स्पष्ट केले.
इम्रान म्हणाला की, आम्हाला वारंवार कर्ज घ्यावे लागते. आंतरराष्ट्रीय दबावानंतरही पाकिस्तान लष्कर-ए-तैयबाला मदत करत आहे, दहशतवाद्यांचे प्रशिक्षण सुरूच आहे. पाकिस्तान सरकारने नुकतेच आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषाकडून (IMF) घेतलेल्या ६ अरब डॉलर बेलआऊट पॅकेजचा पुनरुद्धार सुनिश्चित करण्यासाठी खर्चात कपात आणि अधिक कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पाकिस्तानची तिजोरी रिकामी आहे, उत्पन्न कमी आहे आणि खर्च अधिक आहे. पाकिस्तानमध्ये करप्रणाली सुरळीत लागू होऊ शकली नाही. नागरिकांनी करचुकवेगिरी केली. परंतु त्यांच्या ही गोष्ट अद्याप लक्षात आलेली नाही की, कर वसुली नागरिकांच्या हितासाठीच केली जाते, असे स्पष्ट करत इम्रानने नागरिकांना करप्रणालीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.
सर्वसामान्यांसाठी थेट ऑन-एअर कार्यक्रमा दरम्यान संवाद साधताना इम्रान गगनाला भिडणाऱ्या महागाईबद्दल म्हणाला की, माझी हीच खरी समस्या असून त्यामुळे रात्री झोप येत नाही! रात्रभर जीव तगमगतो. मात्र, महागाई ही जागतिक संकट आहे. जेव्हा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले तेव्हा त्यांना मोठ्या तुटीचा सामना करावा लागला. ज्यामुळे आयातीच्या किंमती वाढल्या. कोरोना विषाणूच्या साथीमुळे अनेक देशांना पुरवठ्याचा तुटवडा जाणवत आहे. महामारीच्या काळात जनतेच्या कल्याणासाठी पाकिस्तानने ८ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. ब्रिटन आणि काही युरोपीय देशांना सध्या विक्रमी महागाईचा सामना करावा लागत आहे. महागाईचा सर्वाधिक फटका पगारदार वर्गाला बसत असल्याचेही इम्रानने स्पष्ट केले.