मुंबई – राज्याच्या राजकारणात उद्याचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते तथा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे हे प्रथमच एका व्यासपीठावर येणार आहेत. राणे हे पूर्वी शिवसेनेतच होते. शिवसेनेत असतानाच ते मुख्यमंत्री झाले होते. मात्र, उद्धव यांच्याकडे पक्षाची सूत्रे गेल्यानंतर राणे सेनेतून बाहेर पडले. तेव्हापासून राणे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष चालत आला आहे. दोन्ही नेते एकमेकांवर अत्यंत शेलक्या शब्दात टीका करीत असतात. त्यासाठी ते एकही संधी सोडत नाहीत. त्यातच उद्या शनिवार (९ ऑक्टोबर) कोकणातील चिपी विमानतळाचे उदघाटन आहे. या उदघाटन समारंभाला मुख्यमंत्री ठाकरे आणि मंत्री राणे हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. गेल्या अनेक वर्षात असा प्रसंग घडलेला नाही. त्यामुळे दोन्ही नेते उद्या एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद साधणार का, साधला तरी ते काय बोलणार, दोन्ही नेते त्यांच्या भाषणात एकमेकांवर टीका करणार की स्तुती यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष उद्याच्या कार्यक्रमाकडे लागले आहे.