सोलापूर – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांकडे आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भाष्य केले आहे. पवार म्हणाले की, अजित पवार यांच्याकडे पाहुणे पाठवले होते. ते पाहुणे येऊन गेले. पाहुण्यांची आपल्याला अजिबात चिंता नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले की, ईडीची नोटीस पाठवणाऱ्यांना जनतेनेच येडी ठरवले आहे. यासंदर्भात त्यांनी एक उदाहरणही दिले. विधानसभा निवडणुकीत मला कारण नसताना ईडीची नोटिस बजावली. मी ज्या बँकेचा सभासद नव्हतो, ज्या बँकेचे मी कधीच कर्ज घेतलं नाही त्याची मला ईडी नोटिस पाठविण्यात आली. आणि महाराष्ट्रातील जनतेने भाजपला येडी ठरवलं. जनतेला सर्व समजते. जनता मतपेटीतून उत्तर देते असेही पवार म्हणाले.
पवार यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे असे
– आज सामान्य माणसाच्या दृष्टीने महागाई हा सर्वात मोठा प्रश्न बनला आहे. असा एकही दिवस जात नाही जेव्हा पेट्रोल-डिझेल दरवाढीची बातमी येत नाही. इंधनाचे दर वाढल्याने दळणवळणाची साधनं महाग होतात आणि त्याचा परिणाम भाजीपाल्यापासून सर्व वस्तूंच्या महागाईवर होतो. याची झळ सामान्य माणसाला बसते.
– भाजपची आर्थिक नीती महागाईला निमंत्रण देणारी आहे. अशा राज्यकर्त्यांविरोधात जनमानस निर्माण करण्याचे काम विरोधी पक्षाला करावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता सामान्य लोकांच्या हितासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे.
– ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे,त्यांना शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही. लखीमपुर खीरी इथे आठ लोक मारले गेले. तुमच्या हातात सत्ता दिली ती लोकांचे भले करण्यासाठी,मात्र याचे विस्मरण भाजपला पडले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचे पाप भाजपने केले. याबद्दल देशभरात संताप आहे.
– मी आवाहन करतो की, महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी मिळून शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध केला पाहिजे. ११ ऑक्टोबर रोजी या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारला आहे. हा बंद आपण यशस्वी केला पाहिजे.
– शांततेच्या मार्गाने, कायदा हातात न घेता, पोलिस यंत्रणेशी संघर्ष न करता, शांततेने रस्त्यावर येण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. हुतात्म्यांचा इतिहास असलेले सोलापूर शहर उत्तर प्रदेशमधील हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, हे दाखवून द्या.
– ५०% जागा महिलांसाठी राखीव असल्याने महिला कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे. तसेच पक्षवाढीसाठी जशी अनुभवी नेत्यांची गरज असते त्याप्रमाणे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तरुणांना पुढे केले पाहिजे. या निवडणुकीत तरुणांना संधी द्या, त्यांना विसरू नका, हा माझा आग्रह राहील.
केंद्रातही लोकशाही पद्धतीने सरकार स्थापन झाले. सत्ता स्थापन झाल्यानंतर त्याचा उपयोग सामान्यांना झाला पाहिजे. पण आपण पाहत आहोत की, ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते लोक सत्तेचा वापर वेगळ्या पद्धतीने करत आहेत. #Solapur
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 8, 2021