इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दाक्षिणात्य चित्रपटांचे अभिनेते धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांच्या विभक्त झाल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. या जोडप्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहून ही माहिती दिली. धनुष आणि ऐश्वर्याने सांगितले की त्यांनी त्यांचे १८ वर्षे जुने वैवाहिक नाते तोडले आहे. तथापि, धनुषचे वडील दिग्दर्शक कस्तुरी राजा यांनी त्यांच्या विभक्त होण्याला कौटुंबिक कलह असल्याचे म्हटले आणि सांगितले की त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही आणि या प्रकरणाला जास्त हवा देऊ नये. आपण शहराबाहेर असून हैदराबादमध्ये राहतो, त्यामुळे येताच याबाबत बोलू, असे त्यांनी यावेळी सांगितले. आता याबाबत ताजी माहिती समोर आली आहे की, दोघेही हैदराबादमधील एकाच हॉटेलमध्ये राहत आहेत.
दोघेही हैदराबाद हॉटेलमध्ये थांबले हा योगायोगही असू शकतो. धनुष आणि ऐश्वर्या हैदराबादमध्ये भेटले की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, दोघे वेगवेगळ्या प्रकल्पांच्या संदर्भात रामोजी राव स्टुडिओमध्ये असलेल्या सितारा हॉटेलमध्ये थांबले आहेत. रामोजी राव स्टुडिओत शूटिंग करणारे बहुतेक सेलिब्रिटी या हॉटेलमध्ये राहतात. असे मानले जाते की, धनुष एका चित्रपटात काम करत आहे तर ऐश्वर्या एका गाण्याचे दिग्दर्शन करणार आहे.
१७ डिसेंबर रोजी धनुषने एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते की,’आम्ही गेल्या १८ वर्षांपासून एक मित्र, एक जोडपे आणि पालक म्हणून एकत्र आहोत.. आमचा प्रवास समजूतदारपणा, तडजोड आणि स्वीकार याभोवती राहिला आहे. आज आम्ही अशा ठिकाणी उभे आहोत जिथे आमचे मार्ग वेगळे आहेत. ऐश्वर्या आणि मी जोडपे म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आम्हाला ते हाताळण्यासाठी आवश्यक गोपनीयता द्या, असेही त्यानी म्हटले आहे. धनुषप्रमाणेच ऐश्वर्यानेही तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट्स करत वेगळे होऊ नका, असे म्हटले आहे.