जगदीश देवरे, नाशिक
ज्या कवीला नाशिक जिल्ह्यातील कवींचा “विकीपिडीया” किवा “चालता बोलता संदर्भ ग्रंथ” असे समजले जाते अशा कवी रविंद्र मालुंजकर यांच्या “आठवांचे लक्ष मोती” या काव्यसंग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले असून हा काव्यसंग्रह नाशिकच्या साहित्यक्षेत्रात एक मानाचे पुस्तक म्हणून ओळखले जाणार आहे.
असे म्हणतात की, “जो न देखे रवी, वो देखे कवी” … परंतु मुळात कवित्व हेच ठासून भरलेला या एका रवीचा हा काव्यसंग्रह कवीतेच्या प्रांगणात आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणारा ठरणार आहे.
दु:ख जगाचे पाहून
मला सुचते कविता
तान्हुल्याच्या हसण्यात
माझी दिसते कविता…
अशा शब्दात आपल्या काव्यप्रेरणेचा प्रवास व्यक्त करणारा हा कवी या काव्यसंग्रहात एकूण सहा भागात आपल्याला काव्यानंद देवून जातो. या पुस्तकाचे नाव “आठवांचे लक्ष मोती” हे जरी शिर्षक असले तरी यात “काळीज अंगण” “देणे कवितेचे” “पाउस शब्दसरीतला” “शिदोरी” “गोतावळा” आणि “विविधा” अशी एकूण सहा वेगवेगळी दालने आहेत आणि या प्रत्येक दालनात
मालुंजकर यांनी आपल्या अनुभव संपन्न साहित्य प्रवासात विविध कविता सजवून ठेवल्या आहेत. लेक हा प्रत्येक बापासाठी आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. हीच लेक जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा आतल्या आत रडणारा तिचा बाप मालुंजकराच्या कवितेचा कवितेचा मुख्य हिरो ठरतो.
लेक चालली सासरी
किती देऊ मी उसासे
बावरल्या मनालाही
आता सावरावे कसे?
या कवितेच्या चार ओळी अशा असंख्य गहिवरलेल्या पित्यांचे प्रतिनिधीत्व करतांना दिसून येतात आणि मग वाचकांच्या डोळ्यात पाऊस साठवल्याशिवाय रहात नाही. या काव्यसंग्रहात पाऊस हा विषय सुध्दा कवी मालुंजकरांनी अतिशय सहजतेने हाताळला आहे.
गाणं गाऊन नभानं
रान चिंबचिंब व्हावं
बळीराजाच्या शेतात
दाणं मोत्याचं फुलावं…
या काव्यसंग्रहात पावसाच्या अशा हळुवार शिडकावा देणा-या काही कविता वाचकाला समाधान देवून जातात. कवी रविंद्र मालुंजकर हे पेशाने शिक्षक आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कवितेविषयी जागरुकता निर्माण करण्याची संधी ते शाळेच्या अतिरीक्त तासात कधीच सोडत नाहीत असा त्यांच्याविषयीचा अनुभव आहे.
रस्त्यात भेटून विद्यार्थी
करतात जेव्हा नमस्कार…
शिक्षकाच्या ठायी यापेक्षा
नसे मोठा कोणता सत्कार !
अशा शब्दात मालुंजकरांनी कवितेतून शाळेचा शिक्षक किंवा गुरूजी जिवंतपणे
साकारला आहे.
मी वही मागितल्यावर
तुम्ही मोठ्या कसरतीने बनवून
द्यायचात माझ्यासाठी
जुन्या पानांची वही.
आज मुलांसाठी नवी
वही आणतांना कुणाचा
व्याकूळ चेहरा दिसला
की, दादा तुमची आठवण येते !
सध्या चाळीशी पन्नाशीच्या आसपास असलेल्या कुणाही वाचकाला आपलीच वाटावी अशी कविता या पुस्तकाचे खरे वैशिष्ट्य आहे. या काव्यसंग्रहात विविध विषयाला स्पर्श करणा-या सुमारे ७० ते ७५ कविता आहेत. यातली प्रत्येक कविता स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व जपतांना दिसून येते. एखादा फुलांचा हार ओवतांना फुलांच्या आकाराची आणि रगांची कल्पक मांडणी करावी लागते. मालुंजकराच्या या कवितासंग्रहाची मांडणी अशीच सुबक आणि कल्पक आहे. कवी रविंद्र मालुंजकर हे खरेतर सुत्रसंचालक. असंख्य कविंच्या उत्तम कविता मालुंजकरांना मुखोद्गत आहेत आणि काव्यसंमेलनाचे सुत्र संचालन करतांना या कवितांचा समयसुचकता वापरून ते नेहमीच उपयोग करीत असतात. कवितेच्या व्यासपीठावर कविता जगण्याची भाषा मालुंजकराना उत्तम ठाऊक असल्याने जसा काव्यसंमेलनाला बहर येतो तसाच बहर या काव्यसंग्रहातून देखील येतांना दिसतो.
वैशाली प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची मुळ किंमत रू.१५०/- इतकी असली तरी ९४२३०९०५२६ किंवा ९८५०८६६४८५ या क्रमांकावर संपर्क साधून सवलतीच्या दरात हे पुस्तक वाचकांना उपलब्ध करून घेता येईल.