मुकुंद बाविस्कर, मुंबई
‘हौसेला मोल नसते ! ‘ असे म्हटले जाते. विशेषतः लग्नकार्यात तर कोण काय हौस करेल हे सांगता येत नाही ? विषेशतः कपडे, दागिने, भेटवस्तू आदि गोष्टींवर हौस म्हणून प्रचंड खर्च केला जातो. डीजे सारख्या कानठळ्या बसवणार्या आवाजाने तर सर्वच हैराण होतात. तरीही डीजे चा वापर केला जातो. इतकेच नव्हे तर काही जण लग्न पत्रिकेची देखील अत्यंत आकर्षक छपाई करून घेतात.
वास्तविक आजच्या काळात ऑनलाइन पद्धतीने लग्नाचे निमंत्रण देणे शक्य आहे. परंतु म्हणतात, ‘ ना हौसेला मोल नसते! आणि खर्चाला किंमत नसते ? ‘असाच काहीसा प्रकार गुजरात मध्ये आढळून आला. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचे लग्न खास असावे असे वाटते. भारतात लग्नात कितीही पैसा खर्च करण्याची फॅशन झाली आहे. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की, आलेल्या आणि न आलेल्या पाहूण्यांनी नेहमी त्यांच्याकडील भव्य लग्न लक्षात ठेवावे.
गुजरातमधील राजकोटमध्ये असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथे एका बड्या व्यावसायिकाने आपल्या मुलाच्या लग्नासाठी निमंत्रण पत्रिका तयार केली, तिचे वजन ४ किलोपेक्षा जास्त आहे. मौलेशभाई उकाणी असे या व्यावसायिकाचे नाव असून त्यांचा मुलगा जय उकाणी याचा विवाह सोनलबेन उकाणी हिच्याशी झाला. त्यांच्या लग्नपत्रिकेचे एकूण वजन ४ किलो आणि वजन २८० ग्रॅम होते. वास्तविक हा विवाह १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान राजस्थानमधील जोधपूरमध्ये पार पडला. मात्र लग्नाला १५ दिवस उलटले तरी सोशल मीडियावर लग्नपत्रिका चर्चेचा विषय ठरत आहे.
विशेष म्हणजे या भारी वजनाच्या लग्नपत्रिकेची किंमत ७,००० रुपये आहे. हा पत्रिका हा बॉक्स गुलाबी रंगाचा असून यात कार्ड उघडल्यावर मलमलच्या कापडात गुंडाळलेले चार छोटे बॉक्स दिसतात. या पेट्यांमध्ये काजू, बदाम, बेदाणे, चॉकलेट्स ठेवलेली असतात. तसेच बॉक्समध्ये ७ पाने आहेत, त्यामध्ये लग्नाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. उकाणी कुटुंबाला भगवान श्रीकृष्णाबद्दल खूप आदर आहे, म्हणून कान्हा तथा गोपालकृष्णाचे चित्रही या निमंत्रण पत्रिकेच्या पेटीला शोभून दिसते.
केवळ लग्नपत्रिकाच नाही तर संपूर्ण लग्नच भव्यदिव्य झाले. हे लग्न जोधपूरच्या ‘उम्मेद भवन पॅलेस’मध्ये पार पडले, जे भारतातील सर्वात शाही आणि महागड्या हॉटेलपैकी एक आहे. उम्मेद भवन पॅलेसमध्ये एका रात्रीसाठी खोलीची किंमत २ ते ३ लाख रुपयांपर्यंत आहे. दरम्यान, या लग्नसोहळ्यात पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या थाळीची किंमत १८,००० रुपये होती. खरे म्हणजे इतक्या पैशात एखाद्या गरीब कुटुंबातील लग्न देखील पार पडू शकते.