नवी दिल्ली – आपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था असून भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक नागरिकाला आपले लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्यांना मतदानाचा देखील अधिकार असला तरी तो सक्तीचा नाही. कोणत्याही निवडणुकीत मतदान करण्याची सक्ती करण्यात येत नाही. परंतु जर अशा प्रकारे मतदान न करणाऱ्या नागरिकांवर दंड आकारला तर काय होईल ? याचा आपण कधी विचार केला आहे का ? खरच तसे घडले का?
आपण देखील मतदार असाल आणि तुमचे नाव मतदार यादीत नोंदवले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांनी व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या मतदानाशी संबंधित “फेक न्यूज” बद्दल पोलिसांना पत्र लिहिले आहे आणि एफआयआर नोंदवून या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे. सीईओने दि. २ डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रानुसार, भारत निवडणूक आयोगाने मतदान न करणाऱ्यांच्या खात्यातून ३५० रुपये कापण्याचे निर्देश दिले आहेत, असे म्हटले असले तरी ते खोटे आहे, असे त्या बातमीत म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने प्रसारित केल्या जाणाऱ्या बातम्या खोट्या असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पोलिस उपायुक्त, इलेक्शन सेल यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, आयोगाने या प्रकरणाची चौकशी करून बातम्या पसरवणाऱ्यांवर कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पत्रात विनंती करण्यात आली आहे की, यासंदर्भात एफआयआर नोंदवण्यात यावा आणि या प्रकरणाचा तपास अहवाल लगेच पाठवावा जेणेकरून तो भारत निवडणूक आयोगाकडे सोपवला जाईल.