इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
दुसऱ्यांपेक्षा चलाख कसे व्हावे
दुसऱ्यांपेक्षा चलाख कसे व्हावे किंवा दुसऱ्यांच्या नजरेत आपण चांगले दिसावे यासाठी लपवाछपवी कशी करावी हे बरेचदा मुलांना शिकविले जाते. काही पालक भीती दाखवून मुलांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र शिक्षण देण्याच्या सर्व पद्धतींपैकी ही सर्वांत वाईट पद्धत आहे. कारण त्यामुळे खोटे बोलणे, फसविणे, ढोंग करणे आणि तत्सम अन्य गोष्टींना प्रोत्साहन दिले जाते. पण तुम्ही मुलांना वारंवार समजावून सांगितले पाहिजे की : “मुलांनो, तुम्ही जर पूर्ण प्रामाणिक नसाल, म्हणजे केवळ दुसऱ्याशीच असे नव्हे, तर स्वत:शी सुद्धा पूर्णपणे प्रामाणिक राहिला नाहीत, स्वत:तील अपूर्णता व कमतरता झाकण्याचा केव्हाही प्रयत्न केलात, तर तुम्ही कधीच कोणतीही प्रगती करू शकणार नाही. कोणतीही प्रगती कधीच न करता, तुम्ही आज जसे आहात तसेच आयुष्यभर राहाल.
तेव्हा तुम्हाला जर नुसत्या प्राथमिक अजाण अवस्थेतून बाहेर पडून विकसित होत जाणाऱ्या चेतनेत उन्नत व्हायचे असेल, तर त्यासाठीसुद्धा सर्वात महत्त्वाची, एकमेव महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा ही आहे. करू नये अशी एखादी गोष्ट तुम्ही केली असेल, तर ती गोष्ट तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाशी कबूल केलीच पाहिजे. तुमच्यामध्ये एखादी अयोग्य अशी ऊर्मी उठली असेल, तर तिच्या नजरेला नजर भिडवून तुम्ही स्वत:ला सांगितले पाहिजे की, ‘हे चांगले नाही’ किंवा ‘हे घृणास्पद होते’, एवढेच नव्हे तर, ‘हे दुष्टपणाचे होते.”