नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर शहरातून १२ वर्षाच्या मुलाच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना गजाआड केले आहे. मुलाचे अपहरण केल्यास पाच ते १० लाख रुपये मिळतील या हेतून संशयितांनी हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले आहे. चिराग कलंत्री या बालकाचे अपहरण करण्यात आले होते. पण, या मुलास सहा तासानंतर रात्री एक वाजता पुन्हा घराजवळच्या परिसरात सोडून दिले होते. पोलिसांनी गजाआड केलेल्या आरोपीचे नाव रोशन नंदू चव्हाण (२३) व यश संदिप मोरे (२२ रा.दोघे कानडी मळा सिन्नर), आकाश भास्कर दराडे (रा.खोपडी ता.सिन्नर) असे आहे.
असे झाले अपहरण
अपहरणाची ही घटना सिन्नर शहरातील काळेवाडा भागात गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. चिराग हा आपल्या घराजवळ मित्रांसमवेत खेळत होता. विना नंबर असलेल्या पांढ-या रंगाच्या मारूती ओम्नी वाहनातून आलेल्या संशयितांनी त्याचे अपहरण केले. मित्रांनी ही बाब त्याच्या कुटुंबियांकडे कथन केल्याने अपहरणाचा प्रकार समोर आला. चिराग हा इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असून त्याचे वडील तुषार कलंत्री हे आडत व्यापारी आहे. त्यामुळे चिरागचे अपहरण केल्यास पाच ते १० लाख रुपये मिळतील या हेतून संशयितांनी हे कृत्य केले.
तातडीने शोध मोहीम सुरू
बालकाच्या अपहरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन अपर जिल्हा अधीक्षक माधुरी कांगणे या सिन्नरला दाखल झाल्या. पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांच्या वाहनाचा माग काढण्याचे प्रयत्न झाले. नाशिकसह पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, नगर पोलिसांना माहिती देऊन ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. दरम्यानच्या काळात सोशल मीडियावर अपहृत बालकाचे छायाचित्र व मारूती ओम्नीची माहिती प्रसारीत करून ही गाडी कुठे दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले. यामुळे घाबरून संशयितांनी रात्री एक वाजता चिरागला मोटारसायकलवर आणून घराच्या परिसरात सोडून दिले. या अपहरण नाट्यासाठी संशयितांनी ३४ हजार रूपयात मारूती ओम्नी कार खरेदी केली होती.
गुन्हा केल्याची कबुली
पोलीस पथके संशयितांच्या मागावर होती. या संदर्भात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रोशन चव्हाण आणि यश मोरे यांना ताब्यात घेतले असता या घटनेचा उलगडा झाला. पोलिस तपासात आकाश दराडे या साथीदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली संशयितांनी दिल्याने पोलिस त्याच्या मागावर होते. संगमनेर शहरात आकाश दराडे याच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य संशयितांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पथकाला १५ हजार रुपयांचे बक्षीस
या गुन्ह्यात उत्कृष्ट कामगिरीबद्दल उमाप यांनी तपास पथकाला १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहिर केले. ही कारवाई सिन्नरचे निरीक्षक संतोष मुटकुळे,सहाय्यक निरीक्षक विजय माळी,उपनिरीक्षक सुदर्शन आवारी,जमादार रामदास धुमाळ,हरिश्चंद्र गोसावी,मिलींद इंगळे,हवालदार रघूनाथ पगारे,पोलिस नाईक शहाजी शिंदे,समाधान बोराडे,कृष्णा कोकाटे,गौरव सानप,सुशिल साळवे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक सागर शिंपी,जमादार रविंद्र वानखेडे,पोलिस नाईक विनोद टिळे हेमंत गिलबिले,प्रदीप बहिरम आदींच्या पथकाने केली.