लातूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अख्ख्या महाराष्ट्राने काका-पुतण्याच्या वादात काकाच वरचढ ठरत असतात, याचे प्रत्यक्ष उदाहरण राजकारणात बघितले आहे. पुतण्याने कितीही ड्रामा केला किंवा वेगळे मार्ग निवडले… तरीही काका काहीतरी क्लुप्त्या करून वरचढ ठरतातच. अशीच फजिती लातुरमधील एका पुतण्याची झाली.
लातूरमधील बुधोडा गावातील ही घटना राजकीय नसली तरीही त्यात काका आणि पुतण्याचे पात्र असल्यामुळे याची चर्चा केवळ गावातच नाही तर आसपासच्या गावांमध्येही होत आहे. काकाने वडिलोपार्जित शेती विकल्यानंतर पुतण्याला त्यातून ४५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. पण पुतण्याला पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्याने दुसरी जागा घेऊन मागितली. पण काकाने काही लक्ष दिले नाही.
पुतण्याचे नाव चांद इसुब शेख असून त्याचे लग्न झाले आहे आणि त्याला मुलं देखील आहेत. त्यामुळे काकाकडून पैसे मिळाले तर ते कुटुंबाच्या कामी येतील, असा विचार चांद करू लागला. किंवा त्या पैश्यांची जमीन घेऊन दिली तरीही कुटुंबाचे कल्याण होईल, असे त्याला वाटले. काकाकडे तो सतत आपल्या हिस्स्याची मागणी करायचा. पण काका काही त्याला भाव देत नव्हता.
अखेर संतापलेल्या पुतण्याने थेट मोबाईलचे टॉवर गाठले आणि आत्महत्येची धमकी दिली. चांदने टॉवरवर चढून गोंधळ घालताच काकासह सगळे लोक तिथे जमा झाले. गावकऱ्यांनी त्याला खाली येण्याची विनंती केली. पण चांद काही ऐकायला तयार नव्हता. काका फक्त उभा राहून तमाशा बघत होता. त्याचवेळी काही गावकऱ्यांनी या घटनेचा व्हिडियो काढून पोलिसांना पाठवला. पोलीस काही वेळातच तिथे पोहोचले आणि चांदला खाली उतरवून त्याला ताब्यात घेतले.
पुढे काय झाले?
चांदला खाली उतरवल्यानंतर लोकांचा जीव तर भांड्यात पडला, पण काकाने सुटकेचा निःश्वास टाकला. कारण मध्यस्थांनी काका-पुतण्याला एकत्र बसवून चर्चा केली. या चर्चेत काकाने काय आश्वासन दिले, हे कुणालाही माहिती नाही. त्यामुळे पुतण्याने आत्महत्या केल्यानंतर जे काही घडले असते, त्यापेक्षा ही वेळ मारून नेत पुढे जाण्याचा मार्ग काकाने निवडला. पुतण्या टॉवरवर चढल्यामुळे त्याला पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काकाच शेवटी वरचढ ठरला.
Uncle Nephew Shole Style Drama