त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अधुनमधुन कोसळणार्या श्रावणसरी अंगावर झेलत तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त हजारो भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली. यावेळी बमबम भोलेच्या जयघोषाने अवघी त्र्यंबक नगरी दुमदुमुन गेली .
श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार हा प्रशासनाची कसोटी पाहाणारा असतो. वास्तविक पहाता वर्षभरात केव्हाही प्रदक्षिणा केली तरी चालते त्याचप्रमाणे भगवान शिवशंकराला प्रिय असलेल्या श्रावण महिन्यात सुध्दा कधीही प्रदक्षिणा केली तरी त्याचे फळ सारखेच मिळते. तिसऱ्या सोमवारी प्रदक्षिणा केल्याने पूण्य अधिक मिळते असा समज पसरल्याने गेल्या काही वर्षांपासून या दिवशी भाविक प्रचंड गर्दी करतात की त्याचे नियोजन जिल्हा पातळीवरून करावे लागते. याचाच एक भाग म्हणून शनिवारी रात्री पासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलीस अधिक्षक सचिन पाटील व अपर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपअधिक्षक कविता फडतरे, पोलीस निरिक्षक संदीप रणदिवे, पो.ऊ.नि. अश्विनी टिळे यांचेसह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. रविवारी सकाळ पासून खासगी वाहनांना त्र्यंबककडे प्रवेश करण्यास बंदी घातली होती. नाशिकहून येणारी खासगी वाहने खंबाळे येथे, जव्हारकडून येणारी वाहने सापगाव येथे तर घोटीकडून येणारी वाहने पहिणे येथे अडविण्यात आली होती. तेथून सर्व प्रवाशांना महामंडळाच्या बसने त्र्यंबकमध्ये सोडण्यात येत होते.
रविवारी सायंकाळ पासूनच भाविकांनी प्रदक्षिणेचा रस्ता धरला होता. संपूर्ण रात्रभर ते सोमवार दुपार पर्यंत प्रदक्षिणा मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. रात्री प्रदक्षिणेच्या भक्तीभावापेक्षा धुडगुसच जास्त होता. जोरजोरात ओरडणे, विचित्र आवाजात किंचाळणे, भोंगे, शिट्टया , जोरजोरात वाद्य वाजवणे असे प्रकार सुरू होते. त्यामुळे धार्मिक महत्व असलेल्या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला विकृत स्वरूप प्राप्त होत आहे. रविवार सायंकाळपासून ते सोमवारी दुपार पर्यंत भाविक प्रदाक्षिणेला जातच होते. जवळपास एक लाख पेक्षा जास्त भाविकांनी प्रदक्षिणा पूर्ण केली. भाविकांची गर्दी पाहता संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर एक मानवी साखळी तयार झाली होती. प्रदक्षिणा मार्गावर विविध सामाजिक संस्थांच्या वतीने फराळाचे पदार्थ, केळी, चहाचे वाटप करण्यात आले. तिर्थराज कुशावर्तावर स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी ३ वाजता पारंपारीक पद्धतीने भगवान त्र्यंबक राजाचा पालखी सोहळा संपन्न झाला .
दुपारी ठिक तीन वाजता भगवान त्र्यंबकेश्वराच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पानाफुलांनी सजविलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला. बॅण्डच्या तालावर वाजतगाजत पालखी कुशावर्त तिर्थावर आणण्यात आली. या ठिकाणी एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची पूजा अभिषेक करण्यात आला. वंशपरंपरागत पुजारी वेदमुर्ती नारायण फडके यांनी पुजाविधी पार पाडला तर शागिर्द म्हणुन सचिन दिघे, मंगेश दिघे, कुणाल लोहगावकर, गंधर्व वाडेकर यांनी सेवा बजावली. आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात आणण्यात आली. या सोहळ्यात मंदिर संस्थानचे विश्वस्त प्रशांत गायधनी, भुषण अडसरे, संतोष कदम यांचे सह देवस्थान ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी, शेकडो भाविक सामील झाले होते. एकादशी व श्रावण सोमवार निमित्त कुशावर्त तिर्थावर स्नानासाठी भाविकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केली होती. जवळपास दोन लाखापेक्षा अधिक भाविकांनी आज येथे हजेरी लावली. पोलीसांतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.