अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाडपासून जवळ असलेल्या अंकाई किल्ल्यावर दर वर्षी श्रावणात अगस्ती मुनींच्या दर्शनासाठी गर्दी होत असते. श्रावणातील तिस-या व चौथ्या सोमवारी विशेष गर्दी या ठिकाणी होत असते. महान तपस्वी अगस्ती मुनींनी या ठिकाणी अनेक वर्ष तप केले आहे. शिवाय वनवासात जाताना प्रभू श्रीरामांनी काही काळ अगस्ती मुनींच्या सानिध्यात घालविला आणि त्यांच्या सांगण्यानुसार प्रभूश्रीराम पुढे नाशिककडे गेले. अगस्ती मुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकाई किल्ल्यावरील गुहेत त्यांचे मंदीर असून या ठिकाणी भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने अनेक दूरचे भाविक येथे दर्शनाला गर्दी करीत असतात. आज तिस-या श्रावण सोमवारी सकाळ पासूनच पाऊस आणि संपुर्ण अंकाई किल्ल्याचा माथा हा पूर्णपणे धुक्याने वेढलेला होता अशा ही परिस्थितीत भाविकांनी किल्ल्यावर दर्शनासाठी गर्दी झालेली होती. अंकाई ट्रॅकर्स ग्रुप तर्फे साबुदाना खिचडी वाटपाचा (भंडारा) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अंकाई किल्ल्याची पुरात्व खात्याने डागडुजी केलेली असल्याने सध्या किल्ल्याला एक वेगळच रुप पहावयास मिळत असल्याने अनेक हौसी पर्यटक सुटीच्या दिवशी ट्रॅकला या ठिकाणी येत असतात.