अनुभवाशिवाय
तब्बल ८०० क्विंटल द्राक्ष उत्पादन करणाऱ्या
मातोरीच्या संगीता पिंगळे
“शेती बोलणं खूप सोपं असतं…करून दाखव!” हे ऐकल्यावर शेतीतील कुठलाही अनुभव नसताना आज पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह ह्याच शेतीवर करून दाखविणाऱ्या नवदुर्गेचा खडतर प्रवास जाणून घेऊया – संगीता पिंगळे – मातोरी (नाशिक)
मातोरी येथील संगीता पिंगळे ह्या आज एक प्रगतीशील महिला शेतकरी जरी असल्या तरी लहानपणापासून त्यांनी काही वेगळी स्वप्नं बघितली होती. शिक्षण चालू असताना पुढे स्पर्धापरीक्षा देऊन अधिकारी व्हायच ठरवलेल्या संगीताताईंनी बीएससी ला प्रवेश घेतला. पण डिग्री पूर्ण होताच घरच्यांनी ताईंच्या लग्नाचा निर्णय घेतल्याने पुढील स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाही. २००० साली ताईंचा मातोरी येथील अनिल पिंगळे यांच्याशी विवाह झाला. यानंतर त्यांच्या जीवनाच्या खडतर प्रवासाला सुरुवात झाली. सासरी कुटुंबाचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत हा शेतीवरच अवलंबून होता.
पती अनिल हे देखील शेतकरीच होते. ताईंना शेतीकामात त्यापूर्वी कुठलाही अनुभव नव्हता आणि लग्नानंतर देखील शेतीकाम न करता त्या घरची कामे पाहत त्यामुळे शेतीशी कधी संबंध आला नाही. हे सर्व करत असताना कुटुंबाची जबाबदारी तर त्या व्यवस्थितपणे सांभाळत होत्याच पण आपण घेतलेल्या शिक्षणाच्या आधारावर आपली एक ओळख निर्माण होऊ शकली नाही हि खंत मनाला त्रास देत होती. यानंतर कधी कल्पनाही केली नसेल अशा घटना आयुष्यात घडू लागल्या. कारण २००१ मध्ये पहिली मुलगी झाली आणि त्याच काळात ताईंच्या वडिलांचे निधन झाले.
२००४ मध्ये दुसरा मुलगा झाला पण हे बाळ अपंग जन्माला आले. आणि दुर्दैवाने केवळ ५ दिवस जगू शकले. पुढचा काळ हा जास्त धक्का देणारा होता कारण २००७ मध्ये ताईंना नववा महिना चालू असतानाच पती अनिल पिंगळे ह्यांचे अपघाती निधन झाले आणि आपला एक मोठा आधार त्यांनी गमावला. या घटनेतून बाहेर येणे ताईंसाठी खूप कठीण झाले होते. त्यानंतर घरात सासू सासरे, दीर, एक जाऊ आणि मूलं हे सर्व होते. २०१७ मध्ये कुटुंब विभक्त झाले, यानंतर ताई, त्यांची एक मुलगी, एक मुलगा व सासू, सासरे हे सोबत राहू लागले.
यापुढील काळ हा खरा परीक्षेचा काळ होता. ताईंच्या वाट्याला १३ एकर शेतीक्षेत्र आलेले होते. सासरे असल्यामुळे शेती चालू होती पण वेगळं झाल्यानंतर तीन महिन्यात ससार्यांचे निधन झाले. आता घराचा मुख्य आधार असलेली शेतीची जबाबदारी सर्व ताईंना सांभाळायची होती. शेतीमध्ये कधीही अनुभव नसला तरी सर्व बळ एकवटून हि शेती करण्याचा निर्णय ताईंनी घेतला. पण या काळात एक महिला सर्व शेती सांभाळणार ही भावनाच अनेकांच्या पचनी पडत नव्हती आणि घरातदेखील यापूर्वी कोणी महिला शेतीत काम पाहत नव्हती. त्यामुळे अनेकांकडून बोलणे ऐकावे लागले.
“शेती बोलणं खूप सोपं असतं.. करून दाखव!” असं एक व्यक्ती ताईंना बोलल्यावर मग शेती करण्याची जिद्द आणखी वाढली. आणि आपले एक अस्तित्व आपण या शेतीतूनच निर्माण करू शकतो या विचाराने त्यांनी पुढे पाऊले टाकली. आता हाती काही नसताना शून्यातून हि सर्व सुरुवात करायची होती. पहिल्या वर्षी शेतीतील काहीही माहिती नव्हती तसेच द्राक्षबागेतून उत्पन्न काढायचे तर भांडवल गरजेचे होते. ह्या दोनही गोष्टींसाठी त्या काळात भावांची मोठी मदत झाली, त्यांच्याकडूनच शेतीविषयक सर्व तांत्रिक गोष्टी त्या शिकत गेल्या.
या काळात थोडी चिंता वाटत होती कारण द्राक्षशेतीचा अनुभव नव्हताच आणि ‘डाउणी, जळकुटी तसेच गारपीट अश्या कारणांनी द्राक्षबाग अयशस्वी होतात’ यासारख्या अनेक गोष्टी यापूर्वी ऐकल्या होत्या. ह्या शेतीमधील एक सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे जमीन हि पाणथळ होती. अश्या प्रकारच्या जमिनीत पावसाळ्यात पूर्णपणे पाणी साचून मोठ्या अडचणी येत. अश्या काळात ह्या जमिनीत चालणे सुद्धा अवघड होत असल्याने स्वतः नळीचा वापर करून पावडर मारायला लागत. शेती तर करायची होतीच पण घर देखील चालवायचे होते, यामध्ये शेतीसाठी लागणारी औषधे, घरी लागणारा किराणा तसेच इतर अनेक गोष्टींसाठी धावपळ करायला घरी कोणी इतर व्यक्तीदेखील नव्हती. मग त्या वेळी स्वतःचे दागिने गहाण ठेऊन एक टू-व्हिलर घेऊन ह्या सर्व कामांसाठी ताई स्वतःच बाहेर पडू लागल्या. पावडर, औषधांच्या दुकानात महिलेला बघून लोकांना थोडं वेगळं वाटायचं पण हळूहळू हाच दृष्टिकोनदेखील बदलत गेला. या सगळ्यात सासूबाईंचा एक मानसिक भक्कम आधार पाठीशी होता.
ह्या सगळ्या संकटाना हिमतीने तोंड देत २०१७ साली द्राक्षशेतीतूनच चांगले उत्पन्न काढले. आणि या पहिल्याच वर्षात ज्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली होती त्यांना त्यांचे पैसे परत केले. द्राक्षात ७०० ते ८०० क्विंटल उत्पादन आज त्या काढत आहे. यात द्राक्षासोबतच टोमॅटो, सोयाबीनची देखील लागवड केली आहे. याच शेतीत जिद्दीने काम करत कुठल्या संकटाची झळ कुटुंबावर पडू दिली नाही सोबतच आज मुलांची शिक्षण देखील सुरळीत चालू आहेत. “मी शेती करूशकत नाही, हा लोकांचा विचार मला खोडून काढायचा होता” हे आपलं विधान यशस्वीरीत्या खरं करून दाखविणाऱ्या संगीताताईच्या हिमतीला सलाम!