गाझियाबाद – अट्टल चोरटे चोरी केलेली रक्कम कशात गुंतवतील असे तुम्हाला वाटते? घर, कार, दागिने जास्तीत जास्त मोठा बंगला खरेदी करण्यावर. पण पत्नी जिल्हा परिषदेची निवडणूक जिकांवी म्हणून एका चोरट्याने चक्क गावातील रस्ते बनविले. एवढेच नव्हे, तर तो ग्रामस्थांच्या गरजा भागविण्यासाठी म्हणजेच लग्नासाठी, शिक्षणासाठी किंवा एखाद्याच्या उपचारासाठी त्याने रक्कम खर्च केली आहे.
गाझियाबादमधील कवीनगरमधील व्यापारी कपिल गर्ग यांच्या घरी झालेल्या दीड कोटींच्या चोरी प्रकरणात सूत्रधार इरफान ऊर्फ उजाले याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्या कारनाम्यांचा उलगडा झाला. त्याचे हे कारनामे ऐकून पोलिसही आश्चर्यचकित झाले आहेत. आरोपीने पोलिसांना सांगितले की, बिहारमधील सीतामढी येथून त्याची पत्नी गुलशन परवीन ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढविणार होती. पत्नीला विजय मिळावा म्हणून त्याने चोरी केलेली रक्कम सात गावांमधील रस्ते तयार करण्यासाठी लावली. तो स्वतः मोठा व्यावसायिक आहे, असे सांगत होता. मदत केल्याच्या बदल्यात मते मिळविण्यासाठी त्याने गावातील अनेक लोकांचा शिक्षण, लग्न, आजारपणाच्या उपचारासाठी एक कोटीहून अधिक रक्कम वाटून दिली.
दीड कोटींच्या चोरी प्रकरणी आरोपीसह त्याची पत्नी, प्रेमिका आणि टोळीतील ११ जणांना याआधीच अटक करण्यात आलेली आहे. तो टोळीतील सदस्यांच्या जामिनासाठी आला होता. पोलिसांनी त्याला अटक केली. जामीन मिळाल्यानंतर त्याची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरली. सोमवारी मतदान होणार आहे. सीतामढी येथील रहिवासी इरफानने निवडणुकीत कोट्यवधींची रक्कम खर्च केली आहे. गावातील गरजू तो घरी येण्याची वाट पाहात असतात, असे पोलिस अधीक्षक निपुण अग्रवाल यांनी सांगितले.
पत्नीपेक्षा चार प्रेमिकांवर सर्वाधिक खर्च
आरोपी इरफानच्या चार प्रेमिका आहेत. चोरीत मोठी रक्कम हाती लागल्यानंतर सर्वात प्रथम तो एका प्रेमिकेच्या घरी जात होता. त्याच्या प्रेमिका अलीगढ, आग्रा, मुंबई आणि सवाई माधोपूर येथील रहिवासी आहेत. चोरीच्या रकमेतून त्याने प्रेमिकांना महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. पोलिसांपासून लपण्यासाठी या प्रेमिका त्याला मदत करत होत्या. त्याला आश्रय देणार्या प्रेमिकांनासुद्धा आरोपी बनविण्यात आले आहे.
कोटीच्या कारचा वापर
पोलिसांच्या माहितीनुसार, इरफान अशिक्षित आहे. त्याला फक्त स्वाक्षरी करता येते. अकरा वर्षांपूर्वी त्याने पहिली चोरी केली होती. त्याच्या बहिणीचे लग्न होते. पैशांची व्यवस्था होत नव्हती. त्यासाठी त्याने चोरी केली. त्यात मोठी रक्कम मिळाली. त्यानंतर त्याने एक टोळीच बनविली. चोरीच्या रकमेतून एक एक कोटीच्या दोन कार खरेदी केल्या. याच कारमधून तो चोरी करण्यासाठी जात होता. त्याने कोणतीही चोरी २० लाखांपेक्षा कमी केलेली नाही. चोरी करण्यासाठी त्याने कधीच रेकी केली नाही. टोळीला कारमध्ये घेऊन तो चोरीसाठी निघत होता.
मोठ्या कोठी दिसल्या की, तो थेट त्यामध्ये घुसत होता.
१२ राज्यांमध्ये ४० घटना
इरफानने पोलिसांना सांगितले, की त्याने आतापर्यंत ४० पेक्षा जास्त चोरीच्या घटनांमध्ये २० कोटींहून अधिक रक्कम चोरी केली आहे. दिल्ली, पंजाब, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तेलंगण, गोव्यासह १२ राज्यांमध्ये त्याने चोरी केली आहे. चोरी करताना कधीही पकडला गेला नाही. ज्या घरांमध्ये चोरी केली, त्या घरांचे वॉचमन झोपलेले होते. रात्री एक ते तीन वाजेदरम्यान त्याने चोरी केलेली आहे.
न्यायाधीशांच्या घरातही चोरी
इरफानने दिल्लीत नोटबंदीपूर्वी एका न्यायाधीशांच्या घरातून ६५ लाख रुपयांची चोरी केली होती. चोरी करण्यासाठी घरात घुसल्यावर कपाटात नोटांच्या गड्डया सापडल्या. त्याने दोन बॅगेत नोटा भरल्या. परंतु एकच गड्डी घेऊ शकला. चोरीनंतर नोटा मोजल्या तर ६५ लाख रुपये निघाले. न्यायाधीशांनी चोरीची तक्रार नोंदविली नव्हती. तसेच त्याने गोव्याच्या राज्यपालांच्या घराजवळील एका व्यापार्याच्या घरातून लाखो रुपये चोरी केले होते.