मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरातील शाळा पुन्हा सुरू होण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील शाळा येत्या सोमवारपासून (२४ जानेवारी) सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यासाठी राज्यभरातून दबाव वाढला होता. संस्थाचालकांनीही सरकारवर दबाव टाकला. अखेर राज्याच्या शिक्षण विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. त्यानुनुसार, ज्याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे तेथे स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन शाळा सुरू केल्या जाणार आहेत. तशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या सर्व वर्गांच्या शाळा सोमवार दि. 24 जानेवारीपासून सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही प्राथमिकता लक्षात घेऊन शाळा सुरू करताना कोविड-19 संदर्भात वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
राज्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव दिला होता. त्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीचा सातत्याने आढावा घेऊन त्यानुसार निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक राहणार आहे. तथापि कोणाचेही शिक्षण थांबू नये हा प्रयत्न असल्याचे प्रा.गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
शाळा सुरू करताना सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनाबरोबरच शाळा व्यवस्थापनाने प्रयत्न करावेत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत.
#कोविड रुग्णसंख्या कमी असलेल्या भागात पूर्व प्राथमिक वर्गापासून १२ वी पर्यंतच्या सर्व #शाळा २४ जानेवारीपासून सुरू करण्यात येतील. विद्यार्थ्यांची सुरक्षितता राखतानाच कोविडविषयक सर्व नियम पाळण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री @VarshaEGaikwad यांनी सांगितले.#SchoolReopens pic.twitter.com/TBaigDFvrq
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 20, 2022
शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला. राज्य टास्क फोर्सचा सल्ला घेऊन मुख्यमंत्र्यांनी अंतिम निर्णय घेतला आहे. टास्क फोर्सच्या काही सदस्यांनी शाळा सुरू करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता पुन्हा शाळा सुरू होणार आहेत. जेथे कोरोनाचा प्रादुर्भाव नाही तेथे शाळा सुरू होणार आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात स्थानिक पातळीवर अधिकार दिले आहेत. त्यामुळे तहसिलदार आणि जिल्हाधिकारी याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने शाळा सुरू राहणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.