मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्गाची सद्यस्थिती लक्षात घेता इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा नक्की कशा होणार, ऑनलाईन की ऑफलाईन याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यामध्ये मतमतांतरे आहेत. गेल्यावर्षी या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे यंदाही या परीक्षांबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
शालेय शिक्षण मंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, राज्यामध्ये इ.पहिली ते बारावीच्या शाळा टप्याटप्याने सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु कोरोनाचा पुन्हा एकदा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करून शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले . इयत्ता दहावी, बारावीसह सर्वच शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा साधारणतः मार्च महिन्यात सुरू होतात. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा बंद असल्या तरीही शिक्षण सुरू राहिले पाहिजे, या धोरणानुसार ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्यात येणार असल्याने त्यादृष्टीने सर्व नियोजनाप्रमाणेच सर्व बाबी कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सद्यस्थिती लक्षात घेऊन ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांनी योग्य ती कार्यवाही करावी व ऑनलाईन शाळांची संख्या, उपस्थित विद्यार्थी, अनुपस्थित विद्यार्थी संख्या याची माहिती दररोज शासनास सादर करावी, असे निर्देश प्रा.गायकवाड यांनी शालेय शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.
असे आहे परीक्षांचे वेळापत्रक
इयत्ता बारावीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या दरम्यान तर इयत्ता दहावीची परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या दरम्यान होणार आहे. यासंदर्भातील घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. मात्र, कोणत्या दिवशी कोणता पेपर होईल, याचे विस्तृत वेळापत्रक आज प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता परीक्षेच्या अभ्यासाचे अचूक नियोजन करता येणार आहे.
या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी ३१ मार्च ते ९ एप्रिल २०२२ असा असेल. प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ३१ मार्च ते २१ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जून २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.
इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/ अंतर्गत गुणांच्या परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ५ एप्रिल ते २५ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता दहावीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा ५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जुलै २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.
खालील लिंकवर क्लिक करुन आपल्याला परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक पाहता येईल
https://mahahsc.in/notification/ssc_m22_1.pdf