श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमालाः
क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद-१५ः
राजकीय कारकीर्द
श्रीअरविंद घोष यांची राजकीय कारकीर्द प्रामुख्याने इ. सन १९०२ ते १९१० या कालावधीत सामावलेली आहे. मवाळ सुधारणावाद हा त्याकाळातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा धर्म होता पण त्यापेक्षाही अधिक थेटपणे भिडून, राजकीय चळवळ लोकांमध्ये पुढे नेण्यासाठीची एक संधी बंगालमधील जनक्षोभामुळे त्यांना मिळाली. परंतु तोपर्यंत सुरुवातीचा जवळपास निम्मा कालावधी ते पडद्यामागे राहून, आपल्या सहकाऱ्यांसोबत स्वदेशी चळवळीच्या (भारतातील सिन-फेन चळवळ) प्रारंभाची पूर्वतयारी करण्याचे कार्य करत होते.
१९०६ मध्ये श्रीअरविंद बंगालमध्ये आले आणि काँग्रेसमध्ये नव्याने स्थापन झालेल्या ‘नवा पक्ष’ या एका अधिक प्रगत, पण संख्येने मर्यादित आणि तोपर्यंत फारशा प्रभावशाली नसलेल्या पक्षामध्ये सहभागी झाले. या पक्षाचा राजकीय सिद्धान्त म्हणायचा झाला तर तो काहीसा ‘असहकाराचा सिद्धान्त’ म्हणता येईल; पण प्रत्यक्षात ‘सब्जेक्ट्स कमिटी’च्या गुप्त पडद्याआडून वार्षिक सभेमध्ये झालेल्या काही किरकोळ चकमकी यांपेक्षा तेव्हा त्याला काही निराळे असे रूप नव्हते….
आपण आता, महाराष्ट्रातील नेते लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली, अखिल भारतीय पक्ष म्हणून एक निश्चित आणि आव्हानात्मक कार्यक्रम घेऊन, जाहीररित्या लोकांसमोर यायला हवे, आणि तेव्हा प्रभावी असलेल्या, मवाळ राज्यधुरंधरांच्या अल्पतंत्राच्या, हातून काँग्रेस व देश हाती घ्यावा यासाठी श्रीअरविंदांनी आपल्या प्रमुखांचे मन राजी केले. मवाळ आणि राष्ट्रवादी (ज्याला विरोधक ‘जहाल मतवादी’ असे म्हणत) यांच्यातील ऐतिहासिक संघर्षाची बीजे प्रथम येथे पेरली गेली होती; त्या संघर्षाने केवळ दोन वर्षात भारतीय राजकारणाचा चेहरामोहराच बदलून गेला.
(क्रमश:)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Article Series ShreeArvind Part15