औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मूळ शिवसेना पक्षातून आउटगोइंग सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटामध्ये इन्कमिंग सुरू आहे, या संदर्भात रोजच वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. सध्या चर्चा सुरू आहे ती जालन्यातील शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची. आपल्यावरील ‘ईडी’चे संकट टाळण्यासाठी नवा मार्ग शोधला असून, राजकीय प्रतिस्पर्धी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी दिलजमाई केली आहे. यानिमित्ताने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खोतकर-दानवे यांची दिलजमाई आणि सेनेत बंडखोरी करुन शिंदे गटात प्रवेश या बाबी अनेक अर्थाने महत्त्वाच्या आहेत.
अर्जुन खोतकर हे लवकरच शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याचे समजते. वास्तविक भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांवर शंभर कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. त्यानंतर त्यांची ईडी चौकशी झाली. आता माझे कुटुंब अडचणीत असल्यामुळे मी निर्णय घेतो आहे, अशी प्रतिक्रिया आज सकाळी खोतकरांनी दिली. त्यामुळे खरेच खोतकरांनी शिवसेना कुठल्या तरी दबावामुळे सोडली का? याची चर्चा सुरू झाली आहे
जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेले खोतकर यांच्यामागे रामनगर साखर कारखाना आणि कृषी उत्पन्न बाजार समितीसंदर्भात ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जालन्यातील रामनगर साखर कारखाना खरेदीप्रकरणी खोतकर यांच्यावर 100 कोटी घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर ईडीच्या पथकाने खोतकर यांची चौकशी केली होती. मात्र, चौकशीतून काहीही निष्पन्न न झाल्याने ईडीने बाजार समितीवर छापा टाकून कागदपत्रांची पडताळणी केली. तसेच रामनगर साखर कारखान्याची मालमत्ता जप्त केली.
जालना सहकारी साखर कारखाना मे. अर्जुन शुगर इंडस्ट्रीज या कंपनीच्या मालकीचा आहे. हा कारखाना आमदार अर्जुन खोतकर यांचे निकटवर्तीय जुगलकिशोर तापडिया यांना कागदोपत्री विकण्यात आला.मात्र, त्यासाठीचा पैसा अर्जुन शुगर्सने दिला. 1984 मध्ये जालना कारखाना उभारण्यात आला. या कारखान्याचे तब्बल 10 हजार सभासद आहेत. जालना सहकारी साखर कारखान्याचा लिलाव करण्यात आला. त्यासाठी थकलेल्या कर्ज वसुलीचे कारण देण्यात आले. विशेष म्हणजे रामनगर येथील जालना सहकारी साखर कारखान्याची 200 एकर जमीन, इमारत आणि मशीन अशी मालमत्ता केवळ 42 कोटी 31 लाख रुपयांमध्ये विकण्यात आली. व्यवहारानंतर ईडीने या मालमत्तेची सर्वेक्षण करून मोजणी केली. तेव्हा त्याची किंमत 78 कोटी 38 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर शंभर कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने जालना येथील खोतकरांचे निवासस्थान, त्यांच्याशी संबधित जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालयावर ईडीने छापेमारी केली. सकाळी साडेआठ वाजता खोतकरांच्या घरावर छापा टाकला. विशेष म्हणजे मध्यरात्री दोनपर्यंत ईडीकडून या प्रकरणाची झाडाझडती सुरू होती. सध्या खोतकर हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत शिंदे यांनी दानवे-खोतकर यांच्यात समेट घडवून आणल्याचे समजते. संकटाच्या काळात कुणीही स्वतःला सेफ करण्याचा प्रयत्न करतो. कुटुंबाचे आणि बाकीचे अनेक तणाव असतात. पुढील निर्णय लवकरच सांगेन, असे खोतकर यांनी म्हटले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी सकाळी खोतकर यांना दिल्ली येथील निवासस्थानी चहापानासाठी निमंत्रित केले होते. या भेटीत उभयतांमध्ये दिलजमाई घडून आल्याचे समजते. वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणाऱ्या बंडखोर आमदारांना उंदराची उपमा देत भाषण करणारे अर्जुन खोतकर सोमवारी मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भेटीला पोहोचले होते. यामुळे अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत, असा अर्थ काढला जात आहे. पण आपण शिंदे गटात गेलो आहोत, असे खोतकर यांनी स्पष्टपणे सांगितलेले नाही.
शिवसेना खासदार संजय राऊत याबाबत म्हणाले की, खोतकर यांच्याशी दोन दिवसांपूर्वीच मी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी दानवेंना गाडल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं होतं. लोकसभा निवडणूक लढवणार आणि दानवेंना कायमचं घरी बसवेन असं ते म्हणाले होते. अर्जुन खोतकर जोपर्यंत समोरुन सांगत नाहीत तोपर्यंत खोतकर शिवसेनेतच आहेत, असेही संजय राऊतांनी स्पष्ट केले.
खोतकर आणि दानवे यांच्यामध्ये २०१४ नंतर राजकीय संघर्ष कायम होता. या राजकीय संघर्षांला सिल्लोडचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचेही पाठबळ होते. अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी गळ त्यांना घातली जात होती. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील राजकीय शत्रुत्व सर्वश्रुत आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांनी एकमेकांवर जबरदस्त टीका केली होती. शिवसेना-भाजप युती होण्यापूर्वी अर्जुन खोतकर यांनी जालन्याच्या जागेवर दावा करत दानवेंना आस्मान दाखवण्याची भाषा केली होती. मात्र युती झाल्यानंतर ही जागा भाजपला देण्यात आली आणि खोतकरांनीही सौहार्दाची भूमिका घेतली. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणल्याची माहिती आहे.
भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची खोतकर हे स्तुती करत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खोतकर यांच्यात मैत्रभाव होता. मात्र, रावसाहेब दानवे आणि खोतकर यांच्यातील राजकीय संघर्षांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात त्यांना सहभागी करून घेण्यापूर्वी या दोन नेत्यांची दिलजमाई होणे आवश्यक मानले जात होते. सोमवारी अशी दिलजमाई झाली. रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनीही दिलजमाईच्या वृत्तास दुजोरा दिला. मात्र, खोतकर शिंदे गटात गेले की नाही, याची अधिकृत घोषणा झालेली नाही, असे म्हटले जाते.
मात्र आता शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. खोतकरांनी काल सकाळी पुन्हा एकनाथ शिंदे यांची दिल्लीत गुप्त भेट घेतली होती. यावेळी त्यांचे कट्टर राजकीय वैरी आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेही उपस्थित होते. मात्र या भेटीचा व्हिडिओ बाहेर पडला आणि खोतकरांचे गुपितही फुटले. परंतु या टॉप सिक्रेट मीटिंगचा व्हिडिओ बाहेर आलाच कसा? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Shivsena Rebel MLA Arjun Khotkar Politics Marathwada