नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथे सुरू असून आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. उद्धव ठाकरे आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी असलेले केसरकरक समोरासमोर आले. यावेळी दोहोंदरम्यान शाब्दिक चकमक झाली. इतकेच नव्हे तर तुम्ही एवढे निर्दयीपणे आमच्याशी कसे वागू शकतात? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केल्याचेही सांगण्यात येत आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची आज दीपक केसरकर यांनी भेट घेतली. या भेटीबद्दलही अनेक चर्चा सुरु आहेत. केसरकरांनी या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली, यावर खलबते सुरु आहेत. या भेटीदरम्यानच उपसभापतींच्या दालनात उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर हे आमने सामने आले. शिवसेनेतील बंडानंतर केसरकर आणि ठाकरे समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने उद्धव ठाकरे यांनी केसरकरांना थेटच सवाल केला की, आम्ही तुम्हाला एवढे मोठे केले, आम्ही तुमचे काय वाईट केले? तुम्ही आमच्याशी एवढे निर्दयीपणे कसे वागू शकतात, असा सवाल ठाकरे यांनी केला.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा हात आहे का, हे तपासून पाहण्यासाठी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी लावून धरली. तर अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याकांड कुणामुळे झाले, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून झाल्याचा आरोप केला जातो. याही प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या दोन्ही चौकशांवरूनच उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकर यांना हे सवाल विचारले असावेत, अशी शक्यता आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हणजेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दीपक केसरकर यांनी राज्यमंत्री वित्त व नियोजन, गृह (ग्रामीण) तथा पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. यापूर्वी जुलै महिन्यात बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आमने सामने आले होते. यावेळी दोघांनीही हस्तांदोलन केले. मात्र या संभाषणात प्रकाश सुर्वे काहीही बोलू शकले नव्हते. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले होते, एवढे जवळचे असून असे कराल असे वाटले नव्हते.
Shivsena Chief Uddhav Thackeray and Deepak Kesarkar Meet Politics