नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आज विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जबरदस्त टोलेबाजी झाली. दोघेही पट्टीचे राजकारणी असून त्यांनी एकमेकाला चांगलेच शालजोडीतले दिले. त्यामुळे सभागृहात चांगलीच हशा पिकली. पवार यांनी सत्ताधारी पक्षावर विशेषतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर चांगलीच तुफान टोलेबाजी केली, कोण कसे बोलतो? याचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केल्याचे सांगत कोणी कसे बोलावे? हे देखील स्पष्टीकरणासह मिश्किल शब्दात सांगितले.
अजित पवार म्हणाले की, शिंदेसाहेब राज्याचे तुम्ही १३ कोटी जनतेचे प्रतिनिधी आहात. आज ३ अतिशय महत्त्वाचे प्रस्ताव तुम्ही मांडले. ते प्रस्ताव देत असताना आख्खा महाराष्ट्र तुमच्या बोलण्याकडे बघत असतो. मुख्यमंत्री शिंदे जेव्हा सभागृहात कोट्यवधींचा प्रस्ताव मांडतात तेव्हा भाजपचे आमदार टाळ्या वाजवत नाहीत, असा दावा अजित पवारांनी विधानसभेत केला. तसेच फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना आक्रमकपणे विधानसभेत भूमिका मांडतात. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून ते आक्रमकपणे बोलत नाहीत, असा दावा देखील अजित पवारांनी यावेळी केला.
वास्तविक पाहता दोन दिवसांपूर्वी विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे उपस्थित नसल्याने विरोधी पक्ष नेते अजित पवार चांगले संतापले होते, पण त्याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कामाचे देखील कौतुक केले होते. त्यामुळे अजित पवार आणि फडणवीसांची जवळीक ही सर्वांना माहीत आहे. त्यामुळेच आता आजच्या घटनेनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांबाबत एक वेगळीच चर्चा रंगली होती. आज मात्र उलट घडले अजित पवार चांगलेच मूडमध्ये होते.
फडणवीसांना चिमटा
अजित पवार म्हणाले की, अध्यक्ष महोदय, आज एक गोष्ट तुम्ही पाहिली का? आज दोन सत्ताधारी पक्षाचे गेल्या १५ दिवसांतले प्रस्ताव होते आणि एक विरोधी पक्षाचा प्रस्ताव होता. तीनचे उत्तर दोघांनी दिले. अजून एका विषयावर चर्चा होईल. पण मी बघत होतो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमकपणे बोलतात, सर्वजण टाळ्या आणि बाके वाजवतात. देवेंद्रजी, माझा तुमच्यावर एक आक्षेप आहे, ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते, त्यावेळी एकही भाजपवाला टाळी वाजवत नाही, असे पवारांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. देवेंद्रजी तुम्ही पाच वर्ष मुख्यमंत्री होता. मुख्यमंत्र्यांनी एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी, कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव सांगितले, तुम्हाला किती जणांनी टाळ्या वाजवले? राईट टू रिप्लाय देत असताना मला सांगा, तुम्ही इतके अस्वस्थ होत होता की, माझे तुमच्याकडे लक्ष होते, कारण तुम्ही माझ्याजवळ बसले आहात. त्यामुळे मी सारखा बारकाईन बघत होतो, असा टोलाही पवारांनी हाणला.
मुख्यमंत्र्यांना टोला
पवार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री कोट्यवधींच्या योजना सांगत असताना काय बोलायचे? अधिकारी काम करत आहेत, प्रस्ताव पाठवलेले आहेत, मान्यता मिळेल, दिल्लीला पाठवले आहे, असे म्हणतात, पण माझे मुख्यमंत्री शिंदे यांना सांगणे आहे, कुठलीही एखादी गोष्ट सांगत असताना, तुम्ही मुख्यमंत्री आहात, मान्यता करतो, प्रस्ताव पाठवला का? असे का बोलता? हे मी करणार, असे बोलाना. मान्यता वगैरे काय? तो तुमचा अधिकार आहे. म्हणे, मी कॅबिनेट पाठवतो. तुम्ही कशाला सांगता, कॅबिनेटला पाठवतो असे म्हणा, मी कॅबिनेटमध्ये करुन घेणार, असे बोला. हे उपमुख्यमंत्री असताना रेटून बोलत आहेत. तुम्ही मात्र जरा मागे मागे येता, असे म्हणताच सभागृहातच चांगलाच हशा पिकला.
…तरीही शरद पवारांनी तुम्हाला मुख्यमंत्री केले नाही
विधानसभेत बोलताना अजित पवारांनी काल महिला मंत्री करण्यासाठी आता थेट अमृता फडणवीसांकडेच जावे लागेल अशा अर्थाचे विधान केले होते. तसेच मी टीका म्हणून बोलत नाही. आपण महिलांना पुरुषांच्याबरोबरीने कामाची संधी द्यावी. निर्णय प्रक्रियेत घ्यावे, असेही पवार म्हणाले होते. या शाब्दिक टोल्याची परतफेड करताना आज उपमुख्यमंत्री फडणवीसांनी पवारांना जोरदार उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षनेते म्हणून दादांनी सांगितले एकदा अमृताशी बोला. पण, दादा हे सांगताना तुम्ही सुमित्राताईंना विचारले होते का? दादांनी अनेक गोष्टींची चर्चा केली. कोण मुख्यमंत्री झाले? किती मुख्यमंत्री झाले? .पण, एका गोष्टीचे दुःख आहे. संधी मिळाली असतानाही तुम्हाला मुख्यमंत्री केले नाही. २००४ मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची संधी होती. तुमचे जास्त आमदार निवडून आले होते. कराराप्रमाणे ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री होतो. पण, ती संधी काही तुम्हाला मिळाली नाही, असे म्हणत फडणवीसांनी शाब्दिक परतफेड केली.
पवारांचा सलग विजय
फडणवीस पुढे म्हणाले की, अजित पवार हे महाराष्ट्राचे आठवे उपमुख्यमंत्री झाले होते. अर्थमंत्रीपदाच्या जबाबदारीसह ते पुण्याचे पालकमंत्री देखील होते. ते सातव्यांदा बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. पवार यांनी सर्वात आधी बारामती लोकसभा निवडणूक जिंकली. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी ही जागा सोडली. त्यानंतर बारामती विधानसभा निवडणूक जिंकली. तेव्हापासून आजपर्यंत ते सलगपणे या मतदारसंघातून निवडून येत आहेत. परंतु त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी काही अद्याप मिळाली नाही, त्यामुळेच फडणवीस यांनी अजित पवार यांना खोचक टीका करीत अशी टोलेबाजी केली.
Politics Ajit Pawar on CM DYCM and Devendra Fadanvis Answer