पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या रंगमंचावर घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींचे श्रेय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत असतील, तर त्यांनी खुशाल ते श्रेय घ्यावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. मुळात नाशिकमध्ये महाविकास आघाडीत झालेल्या गोंधळावर शरद पवार नाराज असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म न दिल्याने अनेकांनी अपक्ष अर्ज दाखल केले. त्यामुळे भाजपला नेमकं काय घडवून आणायचं आहे, याबाबत साशंक वातावरण निर्माण झाले. अश्यात काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना महाविकास आघाडीच्या वतीने एबी फॉर्म दिला, पण त्यांनी उमेदवारी दाखल न करता मुलगा सत्यजित तांबे याला अपक्ष उभे केले. त्यामुळे महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडाली.
या घटनेवर अलीकडेच अजितदादांनी आपल्याला हे माहिती होतं, असा गौप्यस्फोट केला होता. मात्र आता राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांनीही या विषयावर मौन सोडले आहे. ते म्हणाले की, ‘या घडामोडींचं श्रेय देवेंद्र फडणवीस घेत असतील तर त्यांना घेऊ द्या. पण जे घडलं आहे ते सत्य आहे आणि दुर्दैवी आहे. एकत्र बसून चर्चा करून विषय मार्गी लावता आला असता.’ नागपूरमध्ये महाविकास आघाडीने ठाकरे गटाच्या उमेदवाराला उभे केले होते, पण राष्ट्रवादीच्या उमेदवाराने मध्येच अर्ज दाखल केला. त्यामुळे खळबळ उडाली होती. त्याबाबत शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले.
काळजी वाटते
नाशिकच्या जागेबाबत मला पक्षाने कळवले होते. आम्ही एकमेकांना सहकार्य करण्याच्याच भूमिकेत होतो. पण जे काही घडलं त्याबाबत माझ्याशी कुणीही चर्चा केली नाही. आणि आता जे चित्र दिसत आहे, ते बघून मला काळजी वाटते, अशी भावनिक प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
समजूत दाखवावी
नाशिक प्रकरणातील वाद मिटवणे अजूनही शक्य आहे. बाळासाहेब थोरात काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी समजूत दाखवली तर प्रश्न मिटू शकतो. सुधीर तांबे सुद्धा पक्षाच्या बाहेरचे नाहीत, असेही पवार म्हणाले.
Sharad Pawar on Nashik Graduate Constituency Election Politics