नाशिक – येथे होत असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला गालबोट लागले आहे. आज संमेलनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज दुपारच्या सुमारास एका परिसंवादात सहभागी होणारे ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे. त्यामुळे संमेलनस्थळी एकच खळबळ उडाली आहे.
साहित्य संमेलन हे उदघाटनापासून विविध कारणांपासून गाजत आहे. त्यात आता शाईफेक प्रकरणाची भर पडली आहे. आज दुपारी होत असलेल्या वृत्तपत्रांचे मनोरंजनीकरण या विषयावरील परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर हे सहभागी होत होते. त्याचवेळी काही व्यक्तींनी त्यांच्यावर शाई फेकल्याचा प्रकार घडला आहे. कुबेर यांचा चेहरा, डोके आणि कपडे यांच्यावर ही शाई पडली. तसेच, काही पोलिसांच्या अंगावरही शाई पडली आहे. या घटनेमुळे परिसंवादस्थळी काहीशी धावपळ आणि खळबळ उडाली. नेमकी शाई कुणी फेकले हे अद्याप कळू शकलेले नाही.
सुरक्षा रक्षक आणि पोलिस यांनी तातडीने शोधकार्य सुरू केले आहे. काही जणांच्या मते शाई फेकणाऱ्या व्यक्ती या संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते होते. तसेच कुबेर हे नेहमी वादग्रस्त लिखाण करतात, त्यामुळेच त्याचा निषेध करण्यासाठी शाई फेकण्यात आल्याचे सांगितले जात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील अग्रलेख आणि कुबेर यांचे प्रकाशित पुस्तक यात वादग्रस्त विधाने करण्यात आल्याचा आरोप यापूर्वीच संभाजी ब्रिगेडने केला आहे. आज सायंकाळी संमेलनाचा समारोप होत असतानाच त्यापूर्वी ही घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेमुळे संमेलनस्थळी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.