मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बँकेची आर्थिक परिस्थिती न सुधारल्याच्या कारणामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नाशिक जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील को-ऑपरेटिव्ह बँक लि. व्यवहारावर पुन्हा तीन महिन्यांसाठी निर्बंध आणले आहेत. त्यामुळे या बँकेच्या ग्राहकांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही.
विखे – पाटील बँकेला आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेकदा वेळ देण्यात आला मात्र तरी देखील परिस्थिती सुधारली नाही. आरबीआयने आपल्या अखत्यारीत येणाऱ्या कलम ३५अ च्या सब-सेक्शन (१) अंतर्गत येणाऱ्या अधिकारांचा वापर करत या बँकेला आर्थिक स्थिती सुधरवण्यास सांगितले होते. मात्र आर्थिक स्थिती न स्थिरावल्याने बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट १९४९च्या कलम ५६ अंतर्गत १९ मे २०१८पासून बँकेचा व्यवसाय बंद झाला आहे.
१७ नोव्हेंबरपर्यंत पुन्हा एकदा आर्थिक स्थिती सुधारण्याचे बँकेला निर्देश दिले आहेत. दरम्यान, बँकेवर निर्बंध जरी असले तरी बँकेचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही. त्यामुळे निर्बंधांसोबत बँक व्यवहार करु शकते. ज्यात ठेवी काढणे किंवा स्विकारण्यावर बँकेला मर्यादा घालण्यात आल्या आहेत. आरबीआयच्या पूर्व मंजुरीशिवाय बँक कोणतेही लोन रिन्यू करणार नाही. तसेच कोणतीही गुंतवणूक करणार नाही.
कुणाकडूनही उधार घेणे किंवा नवीन ठेवी स्विकारणार नाही तसेच कोणतीही मालमत्ता विकण्यासही निर्बंध घालण्यात आले आहेत. याबरोबरच, बँकेची सद्यस्थिती पाहता ग्राहकांना बचत, चालू किंवा इतर खात्यांमधून पैसे काढण्याची परवानगीही नसणार आहे. बँका त्यांची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करत राहतील. बँकेवर बंदी असली तरी पूर्वीप्रमाणेच कामकाज सुरू ठेवतील असे जाहीर करण्यात आले आहे.
RBI action on Nashik Cooperative Bank Restrictions