श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमालाः
क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद-१८ः
लोकमान्य टिळकांशी अनुबंध
श्रीअरविंद घोष यांच्यावर इ. सन १९०७ मध्ये राजद्रोहाचे संशयित म्हणून कारवाई करण्यात आली पण पुढे त्यांची निर्दोष सुटकादेखील झाली. आत्तापर्यंत ते केवळ एक संघटक किंवा लेखक म्हणूनच ओळखले जात होते, परंतु या घटनेनंतर किंवा त्यांच्या तुरुंगवासानंतर वा इतर नेते विखुरले गेल्यामुळे म्हणा, श्रीअरविंदांना बंगालमधील पक्षाचे अधिकृत प्रमुख म्हणून पुढे येणेच भाग पडले. आणि तेव्हा प्रथमच ते व्यासपीठावरून जाहीररित्या वक्ते म्हणून बोलले.
१९०७ मध्ये ज्या सुरत काँग्रेस परिषदेमध्ये दोन तुल्यबळ मतप्रवाहांमध्ये तीव्र मतभेद होऊन काँग्रेसची दोन छकले झाली; त्या सुरत काँग्रेस परिषदेचे अध्यक्षस्थान श्रीअरविंदांनी भूषविले होते. लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी मवाळांच्या संमेलनास जाण्यास नकार दिला होता आणि परिणामतः काँग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ अशी दुफळी निर्माण झाली होती.
श्रीअरविंद घोष आणि लोकमान्य टिळक एक प्रकारे समानधर्मा असल्याने, त्यांच्यामध्ये विलक्षण अनुबंध निर्माण झाला होता. त्यांनी लोकमान्य टिळकांचे व्यक्तिचित्र रेखाटणारा लिहिलेला सोळा पानी दीर्घ लेख याची साक्ष देतो. तसेच लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर श्रीअरविंद घोष यांनी ‘A GREAT MIND, A GREAT WILL’ या शीर्षकाचा मृत्युलेख लिहिला होता.
लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर, नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती करण्यासाठी (पुढील काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक) डॉ. के. ब. हेडगेवार आणि (पुढील काळात भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक) डॉ. बा. शि. मुंजे हे दोघेही श्रीअरविंद घोष यांना भेटण्यासाठी पॉंडिचेरीला गेले होते. त्यांना त्यांनी स्पष्टपणे नकार देत म्हटले, ”मी टिळकांचे स्थान घेऊ शकेन असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची निवड साफ चुकली असे मला स्पष्ट म्हणावेसे वाटते. मी तर सोडाच, पण त्यांची जागा घेऊ शकेल अशी कोणतीच व्यक्ती मला तरी दिसत नाही.”
(क्रमश:)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Article Series ShreeArvind Part 18