नाशिक – वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना महागाईने होरपळून निघालेल्या जनेतेला आता मोदी सरकार दिवसेंदिवस दणका देत आहे. या वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक शहरात आंदोलन करून सर्वसामान्य महिलांना चूल व लाकडे भेट देऊन उपहासात्मक आंदोलन करण्यात आले.
मागील काही महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरसह इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त होत आहेत. यातच या महिन्यात गॅसच्या किंमतीत दुसऱ्यांदा दरवाढ करण्यात आली असून सर्वसामान्यांना मोदी सरकार झटका देत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना झळा सोसाव्या लागत असून गृहिणीचे घरातील बजेट कोलमडले आहे. कोरोनाच्या कठीण परिस्थितीत अनेक कुटुंबातील लोकांचे रोजगार बुडाले तर काहींना नोकरीपासून वंचित व्हावे लागले. या महामारीतून जीवन पूर्वपदावर येत असतानाच महागाईने कंबरडे मोडले आहे. दिवसेंदिवस पेट्रोल, डीझेल आणि गॅसच्या किमतीत मोठ्या प्रमाणात दरवाढ होत आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहे. मे महिन्यातच घरगुती गॅस सिलेंडर सह व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर दोनदा वाढल्याने सर्वसामान्य जनतेचे खाणेपिणे महाग झाले आहे. या महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह नाशिक शहरात केंद्र सरकार विरोधात घोषणा देत सर्वसमान्य महिलांना चूल व लाकडे भेट देऊन उपहासात्मक आंदोलन केले.
यावेळी शादाब सैय्यद, चेतन कासव, जय कोतवाल, नितीन निगळ, रामदास मेदगे, सागर बेदरकर, निलेश भंदुरे, गणेश पवार, सोनू वायकर, राहुल कमानकर, हर्षल चव्हाण, राहुल पाठक, डॉ.संदीप चव्हाण, निलेश सानप, किरण पानकर, संतोष भुजबळ, रेहान शेख, सुनिल घुगे, विक्रांत डहाळे, अक्षय पाटील, जाणू नवले, मोनू वर्मा, स्वराज्य हाके, केशव येवले, तुकाराम फासाटे, अक्षय खालकर, काशिनाथ चव्हाण, आदिल खान, नबील सय्यद, रझा शेख, निरंजन पगार आदींसह मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दोन वर्षापासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या आजारातून सर्वसामान्य जनता सावरत असताना महागाई मुळे जीव देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. केंद्र सरकार इंधनाची घोडदौड थांबविण्यास असफल ठरत असल्याने बाजारात CNG वाहनाचा वापर वाढला. परंतु त्याचेही दर दिवसेंदिवस गगनाला भिडत असल्याने वाहनचालक त्रस्त होत आहे. “बहोत हो गई महंगाई की मार, अब बस कर यार !” असे बोलण्याची वेळ पंतप्रधानानी सर्वांवर आणली आहे. पंतप्रधानानी गरिबी रेषेखालील महिलांकरिता उज्वल योजनेद्वारे गॅस सिलेंडर देण्याची सक्ती केली. परंतु सध्याची स्थिती बघता त्यांना पुन्हा चूल पेटविण्याची वेळ आली असल्याने आम्ही पुन्हा सर्वसामान्य महिलांना चूल भेट देत आहोत.