नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खत निर्मितीतील उप उत्पादन असलेले फॉस्फर जिप्सम आता महामार्गांच्या बांधणीत वापरले जाणार आहे. याद्वारे टाकाऊतून टिकाऊ काम करणे आणि पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय)ने यासाठी पुढाकार घेतला आहे.
पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत राष्ट्रीय महामार्गाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी टाकाऊ सामग्रीचा वापर करायला प्रोत्साहन देण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवत, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), रसायने आणि खते मंत्रालयाच्या, खत विभागाच्या सहयोगाने, चक्राकार अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी, राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात फॉस्फर-जिप्समचा वापर करण्याच्या दृष्टीने, एनएचएआय प्रकल्पांमध्ये क्षेत्रीय चाचण्या घेणार आहे.
फॉस्फर-जिप्सम हे खत निर्मितीचे उप-उत्पादन आहे. भारतीय खत कंपनीने फॉस्फर-जिप्सम वापरून रस्त्याचे बांधकाम केले आहे, आणि त्यांच्या अहवालावर आधारित, इंडियन रोड काँग्रेस (IRC) ने तीन वर्षांच्या कालावधीसाठी रस्ता बांधकामासाठी निष्क्रिय फॉस्फर-जिप्समच्या टाकाऊ सामग्रीच्या वापराला मान्यता दिली आहे.राष्ट्रीय महामार्गावरील फॉस्फर-जिप्समच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी खत कंपनी आणि सीआरआरआय यांना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) प्रकल्पावर क्षेत्रीय चाचण्या घेण्याचे, आणि महामार्गाच्या बांधकामात फॉस्फर-जिप्सम कचरा सामग्रीच्या वापरावर विविध भागधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एनएचएआय रस्ते बांधणीसाठी टाकाऊ प्लास्टिकच्या वापराला प्रोत्साहन देत असून, त्याची यशस्वी चाचणी यापूर्वीच घेण्यात आली आहे. प्लॅस्टिक कचऱ्याचा वापर करून बनवलेले रस्ते टिकाऊ, शाश्वत आणि बिटुमिनचे आयुष्य वाढवणारे असतात, असे अभ्यासामधून सिद्ध झाले आहे. एक किलोमीटर लांबीचा 4 पदरी महामार्ग बांधल्याने अंदाजे सात टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावायला मदत होते.
त्याचप्रमाणे, एनएचएआय ने महामार्ग आणि उड्डाणपुलाच्या तटबंदीच्या बांधकामासाठी ‘फ्लाय अॅश’म्हणजेच औष्णिक ऊर्जा संयंत्रांमधील (TPPs) कोळशाच्या ज्वलनामधून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म कणांच्या स्वरुपातील राखेचा वापर केला आहे. १३५ किमी लांबीच्या, सहा पदरी ‘ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे’ च्या बांधकामासाठी १.२ कोटी क्यूबिक मीटर फ्लाय-ॲश वापरण्यात आली आहे. एनएचएआय नवीन सामग्रीच्या नाविन्यपूर्ण वापराला प्रोत्साहन देत असून, कार्बन उत्सर्जन कमी करणे, टिकाऊपणा वाढवणे आणि बांधकाम अधिक किफायतशीर बनवणे यावर लक्ष केंद्रित करत आहे.