नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना अंबड परिसरातील चुंचाळे येथे घडली आहे. पती भुजंग अश्रू तायडे याचे पत्नी मनीषा भुजंग तायडे वादातून मनिषावर धारदार शस्त्राने वार करत तिचा निर्घृण खून केला. नंतर त्याने स्वतः घराच्या किचनमधील फॅनच्या हुकला गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड परिसरातील घरकुल योजनेत तायडे कुटुंबिय दोन मुलांसह या ठिकाणी राहत होते. काल पती, पत्नी घरात एकटेच असल्याने त्यांच्यात भांडण झाले. पतीने पत्नीच्या तोंडाला रुमाल बांधून तिच्या गळ्यावर सपासप वार केले. त्यात तिचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर तात्काळ त्यानेही गळफास घेतला. हा सर्व प्रकार घरात घडला. आणि मुले शाळेत होती. ती शाळेतून परत आल्यानंतर घराचा दरवाजा ठोठावत होती. पण, दार कोणीच उघडले नसल्यामुळे मुलांनी जोरात दरवाजा ढकलल्याने दरवाजा उघडला. त्यानंतर या दोघा मुलांना समोर आई वडिलांचे मृतदेह दिसले. त्यांनी याची माहिती शेजा-यांना दिली. त्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घडलेला प्रकार पोलिसांना कळवला. त्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गुन्हे शोध पथकाचे सहायक वसंत खतले यांनी आपल्या टीम सह धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी या दोघांचे मोबाईल ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अंबड पोलीस अधिक तपास करत आहे.