मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महाविद्यालये सुनसाण पडली आहेत. उद्यापासून (मंगळवार) बारावीची परीक्षा असताना कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने कार्यालयीन कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
आश्वासित प्रगती योजना, 58 महिन्याची थकबाकी, 1410 कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने घेतला आहे. त्यामुळे आज अनेक महाविद्यालयांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. बारावी प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असताना त्यासोबतच लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असताना हा संप कार्यालयीन कामकाजावर परिणाम करू शकतो. विशेष म्हणजे विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेल्याने पदवी परीक्षांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
निवेदने व बैठकांची मालिका
विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी अनकेदा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. याबाबत अनेकदा बैठका झाल्या. प्रत्येकवेळी मागण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन देखील देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मागण्या मान्य होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सातत्याने पाठपुरावा
गेल्या तीन वर्षांपासून या प्रलंबीत मागण्यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे. मात्र तरीही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Non Teaching Staff Strike Agitation College Work Affect