इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या देशात महिलांच्या विशेषतः विवाहित महिलांच्या आत्महत्या नेहमीच घडतात ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. कारणे काही असोत, परंतु विवाहितेची आत्महत्या काही केल्या कमी होताना दिसत नाहीत, उलट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत, कधी सासरच्या मंडळींकडून तर काही वेळा अन्य काही कारणाने आत्महत्या घडतात, ही अत्यंत भयानक गोष्ट म्हणता येईल.
झारखंड राज्यामधील जिल्ह्यातील सिसाई येथील बागणी गावात लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहितेने स्वतःच्या दुपट्ट्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. मेंदीचा रंग उडण्यापूर्वीच नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने महिलेच्या सासरच्या मंडळींमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिसाई हद्दीतील लंगटा पाबेया गावातील रहिवासी अझरूल अन्सारी याने आपली मुलगी, शाहीन परवीन हिचा विवाह बागनी गावातील रहिवासी मोंताझीर अन्सारी यांचा मुलगा मोकित अन्सारी याच्याशी लावला होता. मुस्लिम चालीरीती आणि परंपरेनुसार लग्न झाल्यावर लग्नाच्या दुस-या दिवशी शाहीन परवीन आपल्या माहेरी आली होती.
तिने आईला सांगितले की, तिचा नवरा वेडा आहे. अशा व्यक्तीसोबत तिचे लग्न झाल्याने तिने सासरच्या घरी जाण्यास नकार दिला होता, मात्र शाहीनच्या पालकांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, त्याच्या भावाने शाहीनला तिच्या सासरच्या घरी बागनी येथे पाठवले. त्यामुळे शाहीन परवीनने सासरच्या घरात दुपट्ट्याने खोलीत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला असून फाशीच्या कारणाबाबत दोन्ही बाजूच्या नातेवाईकांची चौकशी सुरू आहे.