इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका महिलेने आपल्या दोन मुलींसह पोलिस स्टेशन गाठले आणि स्वतःला धर्मांतरापासून वाचवण्याची विनंती केली. हेमधापूर गावात राहणाऱ्या या महिलेने खुद्द तिच्या कुटुंबीयांनीच तिला मारहाण करून धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे.
महिलेने सांगितले की, सहा वर्षांपूर्वी तिचे लग्न पिपराइच हद्दीतील हेमधापूर येथील रहिवासी सत्य प्रकाश यादव यांच्याशी झाले होते. त्यांना अंशिका ( वय ४ वर्षे) आणि यांशी ( वय २ वर्षे) या दोन मुलींचा जन्म झाला. लग्नानंतर तिचा छळ होत असल्याचे महिलेने सांगितले.
दोन वर्षांपूर्वी तिची नंणद संजना यादव हिने कुशीनगर जिल्ह्यातील हेतीमपूर चिटौनी पट्टी येथील दिलीप फास्टरशी विवाह केला असून तो ख्रिश्चन धर्माचा आहे. संजनाचा पती दिलीप माझ्या घरी वारंवार येत असतो. सासरे, सासू, नंणद संजना यादव आणि रंजना यादव यांच्याकडून मला जबरदस्तीने धर्मांतर करायला भाग पाडले जात आहे. परंतु मला ही गोष्ट न पटल्याने घरातील सदस्य व नंणद व नणंदोई यांनी मला बेदम मारहाण केली.
दरम्यान, एक वर्षापूर्वी, या महिलेने गोरखपूरच्या मुख्यमंत्री ऑफिसचे प्रभारी मोतीलाल सिंह यांच्याकडे कुटुंबातील सदस्यांनी मारहाण आणि जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या प्रकरणाबाबत अर्ज दिला होता. तसेच पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती, मात्र अद्याप कारवाई झाली नाही. या महिलेनेही जीवे मारण्याची भीती व्यक्त केली आहे. पोलिस निरीक्षक मिश्रा यांनी सांगितले की, महिलेची तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल.