मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानपरिषदेच्या जागांसाठी राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विशेषतः नागपूर, नाशिक याठिकाणी महाविकास आघाडी आपल्याच लोकांमुळे अडचणीत येताना दिसत आहे. अश्यात नाशिक येथे गडबड होणार आहे, याचा आपल्याला अंदाज होता आणि आपण बाळासाहेब थोरात यांना तसे सांगितलेही होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे.
नागपूरमध्ये महाविकास आघीडीच्या वतीने ठाकरे गटाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. पण ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज दाखल करून आघाडीची पंचाईत केली. त्याचवेळी काँग्रेस समर्थित शिक्षक संघटनांच्या वतीनेही अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे एकूणच आघाडीत बिघाडी असल्याचे सिद्ध झाले. नाशिकमध्येही आघाडीला अडचणीत आणणारी घटना घडली. काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेऊन आपल्या मुलाला अपक्ष उभे केले. त्यामुळे या निवडणुकीत नाशिकमध्ये काँग्रेसचा उमेदवारच नाही. नाशिकमधील घडामोडींची आपल्याला खबर लागली होती, असे अजित दादा म्हणाले. त्यासंदर्भात आपण बाळासाहेब थोरात यांना आधीच सांगितले होते, असेही ते म्हणाले आहेत.
‘काळजी घ्या’
नाशिकमधील घडामोडींची माहिती मिळताच, काहीतरी शिजतय, तुम्ही काळजी घ्या, असं आपण बाळासाहेब थोरात यांना म्हणालो होतो. पण त्यांनी आमच्या पक्षाचे आम्ही बघून घेऊ, असा विश्वास व्यक्त केल्याचे अजितदादा म्हणाले.
प्रत्येकाचा व्यक्तिगत अधिकार
कोणी कुठल्या पक्षात जायचं, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. कुठल्याही पक्षाचं काम करताना विश्वासार्हता महत्त्वाची असते. मी माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे इतर कोण कुठे जाणार, हे सांगायला मी ज्योतिषी नाही, असेही पवार म्हणाले.
Nashik Graduate Constituency Mahavikas Aghadi Politics