मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या वर्षीच्या अशक्यप्राय वाटणाऱ्या अश्या सत्तांतरानंतर राज्यातील राजकारण वेगळ्या अंगाने सुरू आहे. मूळ पक्षालाच आपलं निवडणुक चिन्ह राखण्यासाठी लढा द्यावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून धनुष्यबाण कुणाचा, यासंदर्भात निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली असून धनुष्यबाण गमावण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यापुढे उभे ठाकले आहे.
कुठल्याही लढाईत राजकीय पक्षांकडे दोन प्लॅन तयार असतात. विजय मिळाला तर आणि पराभव पत्करावा लागला तर, अश्या दोन्ही परिस्थितींमध्ये पुढे जाण्यासाठी राजकीय पक्ष तयार असतात. त्यादृष्टीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही धनुष्यबाण गमावल्यास काय करायचे, याचा प्लान बी तयार ठेवला आहे. १७ जानेवारीला निवडणूक आयोगापुढे होणारी सुनावणी महत्त्वाची मानली जात आहे. अश्यात ठाकरे गटाच्या हातून धनुष्यबाण निसटण्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अशात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा जनतेच्या पुढे येऊन अनोखे आवाहन करू शकतात. त्यासाठी तयारी सुरू झाली असल्याचे कळते. मुळात निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर जनतेला आवाहन करून निर्णय बदलणार नाही. पण पक्षाचं नाव, पक्षाचे चिन्ह ठरविण्याची संपूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरे जनतेवर सोडू शकतात, असे बोलले जात आहे.
काय आहे प्लॅन बी
निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या विरोधात निकाल दिला तर, उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. यात ते आयोगाच्या निर्णयाला आव्हान देऊन चिन्ह आपल्याकडे राखण्यासाठी प्रयत्न करतील. तर प्लॅन बीमध्येच दुसरा पर्याय जनतेवर निर्णय सोडण्याचा त्यांनी घेतला आहे. यात उद्धव ठाकरे जनतेकडूनच पक्षाचं नाव आणि चिन्ह मागवतील. आणि त्यानुसार अंमल करतील.
तर शिंदे गटाचा विजय
निवडणूक आयोगाच्या सुनावणीत सादिक अली केसचा आधार घेतला गेला, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने निर्णय लागू शकतो, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिंदे गट निश्चिंत आहे. पण निर्णय काय लागतो, हे वेळच कळवेल.
Uddhav Thackeray Shivsena Symbol Big Challenge Politics
Election Commission