गौतम संचेती, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत झालेल्या फिक्सिंगमुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. या मतदार संघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी मिळूनही त्यांनी ती नाकारली. त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तर दुसरीकडे या निवडणुकीत मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपने चक्क आपला उमेदवारच रिंगणात उतरवला नाही. त्यामुळे ही राजकीय खेळी वरवर पक्षांसाठी फिक्सिंग असली तरी कार्यकर्त्यांमध्ये या खेळीमुळे प्रचंड रोष आहे. मुख्य पक्षांनी खेळी केली असली तरी ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. अजून अपक्ष व इतर उमेदवार रिंगणात आहेत. माघारीनंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. पण, तोपर्यंत राजकीय पक्षांची विश्वासार्हता या निवडणुकीत कमालीची खालावल्याचे चित्र मात्र धोकादायक ठरु शकते….
नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. काँग्रेसने आज दुपारीच डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केली. तर भाजपने उमेदवारच जाहीर केला नाही. त्यामुळे शेवटपर्यंत नाशिकच्या विभागीय कार्यालयात उमेदवारीवरुन मोठा सस्पेन्स दिसत होता. पण, शेवटच्या काही तासांत मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. सुधीर तांबे यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारली. त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. आणि भाजपने उमेदवारच दिला नाही. हा सर्व राजकीय ट्विस्ट काय आहे. हे सर्व समजण्याच्या आताच हे धक्के सर्वांना बसले व दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवारच या निवडणुकीत राहिले नाहीत. सत्यजित तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी यासाठी प्रयत्न केले गेले. पण, ती न मिळाल्यामुळे ही खेळी केल्याचे बोलले जात असले तरी हे सत्ताधारींशी संधान असल्याचे मात्र नंतर उघड झाले..
पदवीधर मतदार संघातून सलग तीन वेळा कॉंग्रेसकडून निवडणूक लढवत आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी यशस्वी बाजी मारली. यावेळेसही त्यांना पुन्हा संधी होती. पण, त्यांनी मुलासाठी या निवडणुकीचे दार उघडून दिले. ज्या काँग्रेस पक्षाने त्यांना तीन वेळा संधी दिली. त्यांच्या आदेशाला मात्र त्यांनी केराची टोपली दाखवली. त्यामुळे काँग्रेस पक्ष यावर काय भूमिका घेते हे महत्त्वाचे असणार आहे. दुसरीकडे मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने पाच जिल्ह्याच्या या मतदार संघात वर्चस्व असतांना आपला उमेदवार अधिकृतपणे न उतरवणे यामुळे कार्यकर्त्ते कमालीचे अस्वस्थ आहेत. या निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यातील धनराज विसपुते यांनी जोरदार तयारी केली होती. ते तीन वर्षापासून मतदारांच्या संपर्कात होते. ७० ते ८० हजार मतदारांची नोंदणी करुन त्यांनी निवडणूक जिंकण्याचा मास्टर प्लॅनही तयार केला होता. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना उमेदवारी मिळेल असे चित्र असतांना भाजपने उमेदवारच दिला नाही. विसपुते यांच्या राज्यभर शैक्षणिक संस्था असून ते भाजपचे जुने कार्यकर्ते आहे. त्यांना मात्र या राजकीय खेळीचा मोठा धक्का बसला आहे.
या सर्व घडामोडीनंतर सत्यजित तांबे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, आम्ही कॉंग्रेस पक्षाकडे मागणी केली होती, कॉंग्रेस मधून मला उमेदवारी देण्याची त्यांची इच्छा होती. शेवटच्या क्षणी मला कॉंग्रेसकडून अधिकृत एबी फॉर्म मिळू शकला नाही म्हणून अपक्ष अर्ज भरला. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसह मला सर्वांच पक्षांचा पाठिंबा हवा आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मला मदत करावी. देवेंद्र फडणवीस यांनीही मला पाठिंबा द्यावा यासाठी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तांबे यांच्या प्रतिक्रियेनंतर भाजपच्या एका जेष्ठ कार्यकर्त्यांनी ही सर्व वरिष्ठ पातळीवरची खेळी आहे, असे दिसून येते. भाजप नेते आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही दिलेली प्रतिक्रीया बोलकी आहे. यात स्थानिक कार्यकर्त्यांना काहीच सांगण्यात आले नाही. शेवटपर्यंत उमेदवार कोण आहे याची आम्ही वाट बघत होतो. पण, आज आम्हालाही धक्का बसला. यातून चुकीचा संदेश जाईल. कार्यकर्ते अस्वस्थ आहेत, असे दिसून येत आहे.
खरं तर वरवर हा सस्पेंस, ट्विस्ट व राजकीय खेळी वाटत असली तरी याचा प्लॅन दोन महिन्यापूर्वीच ठरला असल्याचे बोलले जात आहे. यात तांबे यांचे नातेवाईक असलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात व भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी हा धक्का आहे. त्यांच्या राजकारणासाठी ही खेळी फारशी साजेशी नाही. बदलत्या राजकीय परिस्थितीत तांबे कुटुंबियांना कोणता झेंडा धरु हाती असा प्रश्न पडल्यामुळे त्यांनी ट्विस्ट आणला हेच सत्य आहे व त्यातूनच त्यांनी अपक्षचे राजकारण करुन आता विजयाच्या दिशेने पावले उचलली आहेत.
Nashik Graduate Constituency Election Political Analysis
Dr Sudhir Tambe Satyajit Tambe BJP Congress Politics
Gautam Sancheti