नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नदीपात्रात रविवारी दोन मृतदेह मिळून आले आहे. यात दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यात नुकतेच जन्मलेल्या पुरूष जातीच्या अर्भकासह तरूणाचा समावेश आहे. अर्भकास कुमातेने नंदीनी नदीपात्रात फेकल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे तर तरूणाने गोदापात्रात उडी घेत आत्महत्या केली का घातपात याबाबत पोलिस तपास करीत आहे. याप्रकरणी सातपूर आणि पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. पहिल्या घटनेत पोलिस भरतीच्या सरावासाठी केटीएचएम महाविद्यालय परिसरात शनिवारी दुपारी अक्षय रमेश शिरसाठ (२३ रा.शांतीनगर,मखमलाबाद) हा युवक गेला होता. रात्री उशीरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबिय त्याचा शोध घेत असतांना रविवारी दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह गोदावरी नदीपात्रात तरंगतांना मिळून आला. अग्निशमन दलाने त्यास पाण्याबाहेर काढल्यानंतर त्याची ओळख पटली असून त्याने आत्महत्या केली की ? त्याचा घातपात झाला याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात मनोज जाधव यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक आहिरे करीत आहेत. तर दुस-या घटनेत स्वारबाबानगर येथील नंदीनी नदी पात्रात कपारीला अडकलेल्या अवस्थेत रविवारी सायंकाळच्या सुमारास नवजात अर्भक आढळून आले. कांबळेवाडी येथील राजेश पांडे यांनी याबाबतची खबर दिल्याने पोलिसांनी धाव घेत अर्भकास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असून आपले पाप लपविण्यासाठी अज्ञात कुमातेने त्यास नंदीनी नदीपात्रात फेकून दिल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.