नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे नवजीवन विधी महाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवकांचा ध्यास, ग्रामशहर विकास’ या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराच दुसरा दिवस ग्रामपंचायत, ग्राम संस्कार केंद्र विचुरीगवळी ता. जि. नाशिक येथे संपन्न झाला. आज सकाळच्या सत्रामध्ये रा. से. यो. च्या स्वयंसेवकांनी योगाचे धडे गिरविले. स्वयंसेवकांचे निवासस्थान ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. त्यात विविध सामाजिक जनजागृती करणाऱ्या घोषणांची आतषबाजी करण्यात आली. स्वयंसेवकांनी गावातील ग्रामपंचायत परिसर तथा विविध तीन ठिकाणच्या मंदिराच्या परिसरातील स्वच्छता केली.
संध्याकाळच्या वैचारिक प्रबोधन या सत्रात डॉ. समीर चव्हाण सर (नवजीवन विधी महाविद्यालय, नाशिक तथा सदस्य, विधी अभ्यासमंडळ, सा. फु. पु. वी. पुणे) यांनी राष्ट्र उभारणीसाठी युवकांचा सहभाग या विषयावर सखोल मार्गदर्शन करून व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफले. बोलतांना ते म्हणाले, केवळ वयाचं तारुण्य असून चालत नाही तर प्रत्येक व्यक्तींनी मनाने आणि विचाराने चिरतरुण राहावे. हाच राष्ट्र उभारणीचा मुख्य पाया ठरणार आहे. यावेळी त्यांनी इतिहासातील विविध महापुरुष आणि महामानवांचे दाखले देऊन अगदी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांसमोर विषय ठेवला. आजचा युवक बेकरी, बेरोजगारी, तणाव, व्यसनाधीनता, व्यायामाचा अभाव, असामाजिकता आणि समाजमाध्यमाच्या विळख्यात अडकलेला युवक इत्यादी समस्यांचा सामना करत असल्याचं मत व्यक्त केलं.
बदलत्या काळानुसार समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या अपेक्षाही बदलत असतात. आज देशासाठी मर मिटण्याची वेळ नाही, तर स्वराज्याच सुराज्य करण्यासाठी छोट्या छोट्या दैनंदिन कृतीतून राष्ट्र उभारणीसाठी हातभार लावता येईल. २१ व्या शतकातील विद्यार्थी म्हणून 4-D (Devotion, Descipline, Dedication & Determination) आणि 5-C (Competance, Confidence, Connection, Character & Caring) चा योग्य वापर करून राष्ट्र उभारणीसाठी आपलं योगदान द्यावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या डॉ. प्रज्ञा सावरकर मॅम विचारमंचावर उपस्थित होत्या. त्यांनी विविध विषयांवर अतिशय खेळी-मेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांशी हितगुज साधला.