नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कानाला मोबाईलचा हेडफोन लावल्याने रेल्वे रुळ ओलांडत असतांना रेल्वेचा आवाज तिला ऐकू न आल्याने एका विद्यार्थीनीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली. इगतपुरी येथील महाविद्यालयात अकरावी मध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थींनेचे नाव प्रियंका नामदेव कोकणे (वय १७) असे आहे. ती इगतपुरी तालुक्यातील जानोरी या गावाची होती. जानोरी येथील रेल्वे फाटकाजवळ मोबाईलवर बोलत ती महाविद्यालयात निघाली होती. प्रियंकाच्या कानात हेडफोनमध्ये गाण्यांचा आवाज मोठा असल्याने तिला ट्रेनचा आवाज आलाच नाही. त्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जाते. ही घटना समजताच जानोरी गावावर शोककळा पसरली आहे. रस्ता ओलांडतांना काळजी घेणे गरजेचे आहे. त्यात रेल्वे रुळ ओलांडतांना दोन्हीबाजूला रेल्वे येते की नाही हे बघणे सुध्दा गरजेचे आहे. त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली.