नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्क्रॅप खरेदी विक्री व्यवसायात नाशिकच्या व्यापा-याला साडे छत्तीस लाख रूपया गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे देवूनही भामट्यांनी स्क्रॅप (भंगार) न पाठविल्याने व्यापा-याने पोलिसात धाव घेतली असून याप्रकरणी तीघा परप्रांतीयासह नागपूर येथील एका विरूध्द अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय कुमार गुप्ता (रा.रांची झारखंड),प्रितीश मुंग मोडे (रा.नागपूर) आणि अमिर व अरूण (रा.दोघे रतलाम,मध्यप्रदेश) अशी व्यापा-यास गंडविणा-या संशयित भामट्यांची नावे आहेत. याप्रकरणी सैलाब तिहूल सहानी (रा.अजमेरीनगर,सातपूर अंबड लिंकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. सहाणी यांचा स्क्रॅब मटेरियल खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. १८ ऑक्टोबर रोजी भामट्यांनी सहाणी यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी मध्यप्रदेशातील रतलाम येथे अॅग्रो कंपनीचे स्क्रॅप मटेरियल विक्रीस उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे सहानी यांनी मध्यप्रदेश गाठून खेतान अॅग्रो फर्टिलायझर्स प्रा.लि. कंपनीत जावून स्क्रॅपची पाहणी केली होती. स्क्रॅप पसंतीस पडल्याने हा व्यवहार झाला होता. सहाणी यांनी ठरल्याप्रमाणे अडीच महिन्यांच्या कालावधीत रोख व आरटीजीएसच्या माध्यमातून सुमारे ३६ लाख ६८ हजार ७३६ रूपये अदा केले मात्र संशयितांनी स्क्रॅपची पोहच न दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक कातकाडे करीत आहेत.