नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– चुंचाळे शिवारात सोसायटीच्या पार्किंगमध्ये गोंधळ घालत चार जणांच्या टोळक्याने मायलेकांना मारहाण करीत महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उध्दव उर्फ टकल्या अशोक राजगिरे,लक्ष्मण उर्फ लक्ष्या राजेंद्र कोळी, भुषण सुरेश सिंग व आदित्य उर्फ आदया पांडे (रा.सर्व घरकुल योजना चुंचाळे) अशी संशयितांची नावे आहेत. या टोळक्यातील तीघे सराईत असून त्यांच्यावर पोलिस दप्तरी गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यातील पांडे वगळता अन्य संशयित पोलिस रेकॉर्ड वरील आहेत. पीडित महिला राहत असलेल्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये मंगळवारी संशयित टोळके आरडाओरड करीत वाहनांचे नुकसान करीत होते. यावेळी पिडीतेने मोटारसायकलीची तोडफोड का करता असा प्रश्न उपस्थित केला असता राजगिरे आणि कोळी यांनी आमच्या नादी लागते का असे म्हणून महिलेच्या अंगावर धावून जात विनयभंग केला. या वेळी आपल्या आईच्या मदतीला धावून आलेल्या मुलास टोळक्याने शिवागाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. घटनास्थळी सोसायटी सदस्यांनी धाव घेतली असता राजगिरे याने धारदार चाकूचा धाक दाखवत दहशत माजविली. मी एक खून केला असून दुसरा करण्यास मागेपुढे पाहणार नाही अशी धमकी त्याने रहिवाश्यांना दिली. दरम्यान या भागात गुन्हेगारांचा सुळसुळाट झाला असून वर्चस्वातून दहशत माजविण्यासाठी गुन्हेगार कुणावरही हल्ले करीत असल्याचे बोलले जात आहे. अधिक तपास उपनिरीक्षक कातकाडे करीत आहेत.
……..
२६ वर्षीय महिलेने विषारी औषध सेवन करून केली आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- २६ वर्षीय महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना पंचवटीतील पागे वस्तीत घडली. सोनाक्षी कुशाल पागे (रा.पाटाजवळ,महादेव कॉलनी) असे मृत महिलेचे नाव आहे. सोनाक्षी पाक्षे यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोनाक्षी पागे यांनी गेल्या शुक्रवारी (दि.२६) आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता बुधवारी उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.