सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त प्रकरण अद्यापही मिटले नसून त्याचे तीव्र पडसाद उमटतच आहेत. राज्यपालांचा निषेध करण्यासाठी उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. यासंदर्भात आता उदयनराजे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. ते म्हणाले की, बघेल, मी वेळप्रसंगी तेही करेल असे सांगत उदयनराजेंनी खासदारकी सोडण्याचेही संकेत दिले आहेत. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपालपदावर राहण्याचा अधिकार नाही. भाजपच्या शीर्ष नेत्यांनी त्यांचा तातडीने राजीनामा घेण्याची मागणी उदयनराजेंनी केली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यपालांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी उदयनराजेंनी आज रायगडावर शिवभक्तांशी संवाद साधला. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. तर दुसरीकडे आता राज्यपाल कोश्यारी आणि भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच आता राज्यपालांना पदमुक्त केले नाही तर खासदारकीचा राजीनामा देणार का? या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, ती त्या वेळची गोष्ट आहे, काय होईल काय नाही होणार, ते पाहून मी त्यावेळी निर्णय घेईल. माझी भूमिका मी बदलत नाही. कुठल्याही राजकारणासाठी मी त्यापासून फारकत घेणार नाही, असेही उदयनराजे यावेळी म्हणाले.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यपाल कोश्यारी आणि भाजपविरोधात आज उदयनराजे भोसले यांनी रायगडावर आत्मक्लेश आंदोलन केले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणाबाबत भूमिका स्पष्ट करताना राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. तसेच भाजपला थेट इशारा दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी शिवप्रेमींशी संवाद साधून मोर्चाची हाक दिली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधून सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
उदयनराजे पुढे म्हणाले की, मी कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही. महाराजांचा अवमान झाल्यानंतर हे राजकीय पक्ष अद्याप केवळ प्रतिक्रियाच देत आहेत. या उलट का ठामपणे भूमिका घेत नाही?, असा संतप्त सवाल त्यांनी केला. देशात राष्ट्रपतीपद हे सर्वोच्च आहे. तसेच राज्यात राज्यपाल हे सर्वोच्च पद आहे. त्यांनीच अवमान केला तर त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. माझा रोष कुणावर नाही. पण राज्यपालांची हकालपट्टी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत म्हणाले होते की, खासदार उदयनराजेंनी मुंडके छाटण्याची भाषा करण्याऐवजी सर्वात आधी भाजपच्या सदस्यत्वाचा व खासदारकीचा राजीनामा द्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा त्या पक्षात राहणे योग्य नाही. आम्ही उदयनराजेंसोबत आहोत. त्यांनी भाजपमध्ये राहू नये, असा सल्ला संजय राऊत यांनी उदयनराजेंना दिला होता.
लवकरच आझाद मैदानात जाणार
उदयनराजे म्हणाले की, मला त्यांचे नावही घ्यायचं नाही, आता तर थेट अवमानही केला जातोय. हे किती प्लॅनिंगने चालले आहेत. शिवाजी महाराजांचे नावही पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यपाल इथं असते तर टकमक टोकावरून फेकून दिले असते, असेही उदयनराजे म्हणाले.
भाजपाच्या नेत्यांवर हल्लाबोल करत उदयनराजे म्हणाले की, काय वेळ आलीये? महाराजांचा जयघोष करण्यासाठी आलो असतो, तर वेगळा आनंद झाला असता. पण आपण काय करतोय? शिवसन्मानाचा निर्धार करण्याची वेळ आपल्यावर आली. या लोकांना लाजा वाटल्या पाहिजेत की, शिवाजी महाराजांचा अवमान यापुढे कुणी करूनच दाखवावा. काय होईल, ते आपल्या परीने आपण बघूनच घेऊ.
कुणालाही महाराजांचा अवमान करण्याचा अधिकार नाही. राजकीय मंडळी स्वत:च्या स्वार्थासाठी त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतात. तसेच माजी मंत्री व भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेबद्दल देखील त्यांनी टीका करीत त्यांचाही समाचार घेतला.
MP Udayanraje Bhosale on Resignation Politics