इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठीतील एक अभ्यासू आणि गुणी अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशी ओळखली जाते. स्पृहा जेवढी हुशार अभिनेत्री आहे तितकीच उत्तम सूत्रसंचालक आहे. स्पृहा आणि तिचा नवरा वरद ही देखील एक गोड जोडी आहे. ते फारसे कधी मुलाखतीला वगैरे एकत्र दिसत नाहीत. पण त्यांची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. सध्या ‘लोकमान्य’ मालिकेतील भूमिकेमुळे स्पृहा चर्चेत आहे. तिने स्वतःच त्यांच्या नात्याबद्दल काही गोष्टी उघड केल्या आहेत. विशेष म्हणजे, स्पृहाला लग्नाआधी तिचा नवरा अजिबात आवडला नव्हता. तरीही आज या दोघांची जोडी मनोरंजन क्षेत्रातील गोड जोडी म्हणून ओळखली जाते.
स्पृहाने आपल्या नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली. यात तिने आपली जोडी कशी जमली, एकमेकांबद्दल काय आक्षेप होते, हे सांगितले आहे. मी वरदला जेव्हा पहिल्यांदा भेटले, तेव्हा तो ‘लोकसत्ता’ या मराठी वृत्तपत्राचा कॉलेज प्रतिनिधी म्हणून काम करत होता. आणि माझा सिनियरही होता. त्यानंतर आम्ही दोघांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्रात इंटर्नशिप केली. यात तो आमच्या टीमचा प्रमुख होता. एकत्र काम करताना भाषा आणि इतर अनेक मुद्द्यांवर आम्ही दोघांनी एकमेकांबद्दल काही मतं बनवली होती. त्यानंतर एकदा याच वृत्तपत्रात एका मोहिमेदरम्यान मी अँकरिंग केलं होतं. त्यावेळी आम्ही एकमेकांबद्दल जितका वाईट विचार करतोय, तितके वाईट आम्ही नाही, हे आमच्या लक्षात आल्याचं स्पृहा सांगते. या प्रसंगाचा उल्लेख स्पृहाने आपल्या पोस्टमध्ये केला आहे. आणि त्यानंतर पुढे सर्व काही आनंदात झाल्याचं ती सांगते.
वरद तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुझ्या पहिल्या भेटीपासून ते आयुष्यभर कायमची छाप पाडण्यापर्यंत…”, असेही स्पृहा जोशीने या पोस्टमध्ये म्हटले आहे. सुरुवातीला त्या दोघांची एकमेकांबद्दलची मतं फार बरी नव्हती. स्पृहा सांगते, “माझं वरदबद्दलचं पहिलं इम्प्रेशन फारच वाईट होतं. मला तो अजिबात आवडला नव्हता. त्याला बातम्या दाखवणं, विषय सांगणं हे मला पटायचं नाही. वरदला सुद्धा स्पृहा एक वशिला लावून झालेली कॉलेज प्रतिनिधी वाटायची.
“एका प्रोजेक्टवर आम्हाला जबरदस्तीने काम करावं लागलं ज्यात आम्ही मिळून दोन महत्त्वाचे विभाग सांभाळत होतो. तेव्हा आमची जास्त मैत्री झाली. आम्हाला डेट करायला लागल्यावर असं लक्षात आलं की आमचं हे नातं लग्नापर्यंत टिकेल. आम्ही दोघेही गांभीर्याने नात्याकडे बघणारी दोन लोकं होतो. आम्ही एकमेकांना वेळ दिला, नात्यासाठी वेळ घेतला. सगळं बऱ्यापैकी स्वच्छ दिसत होतं. त्यामुळे आम्ही लग्नाचा निर्णय घेतला”
स्पृहा आणि वरद यांच्या लग्नाला ८ वर्षे झाली आहेत. २०१४ मध्ये त्या दोघांनी लगीनगाठ बांधली. त्यापूर्वी ते दोघेही ६ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. २८ नोव्हेंबर २०१४ रोजी या दोघांचा विवाह झाला. वरदने त्याची कारकीर्द पत्रकार म्हणून सुरू केली होती. पण नंतर त्याने पत्रकारितेचे क्षेत्र सोडून मार्केटिंग क्षेत्राची वाट धरली आहे.
Marathi Actress Spruha Joshi Husband First Meet Memories
Entertainment