मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकेकाळी केंद्रात आणि महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता होती, तेव्हा राज्यातील नेते सतत दिल्लीच्या वाऱ्या करत असत. त्या काळात प्रसिद्ध व्यंगचित्रकार व शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे मार्मिक मध्ये दिल्लीमध्ये राज्यातील नेते विशेषतः मुख्यमंत्री यांचा कसा अपमान होतो, या संदर्भात मार्मिक मध्ये व्यंगचित्र प्रसिद्ध करत असत. या घटनेची आठवण होण्याचे कारण म्हणजे सध्या देखील दिल्लीत तसाच एक प्रसंग घडल्याचे सांगण्यात येते, त्यावरून उलट सुलट चर्चा सुरू आहे.
देशाची राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीला देशातील जवळपास सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मात्र, या बैठकीला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मात्र अनुपस्थित राहिले. या बैठकीचा एक फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला विषय ठरला आहे. नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींसह अनेक केंद्रीय मंत्री आणि उपस्थित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा एक फोटो अनेकांकडून ट्वीट करण्यात आला आहे. या फोटोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेवटच्या रांगेत उभे असल्याचे दिसून येत आहे. त्यावरुन दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान झाल्याची टिका सूर आता विरोधकांकडून आळवला जातोय. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नेते रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.
इतिहासात औरंगजेबाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी गेले, दुसऱ्या रांगेत उभं केलं म्हणून त्यांनी ती सभा सोडली. आता आपल्याला तिसऱ्या रांगेत जाऊन उभे राहावे लागत आहे. परिस्थिती किती बदलली आहे. महाराष्ट्रात किती झुकलाय हे पाहायला मिळत आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. त्याचवेळी तिथला प्रोटोकॉल अल्फाबेटिकली असतो, त्यामुळे ते मागे उभे राहिले असती, असेही पाटील खोचकपणे म्हणाले.
एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक #मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात! pic.twitter.com/3xYPid3U3N
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 7, 2022
रोहित पवार यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन संबंधित खासदारांसमवेत बैठक घेतली होती. यानंतर त्यांनी १२ खासदारांसह एक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. दिल्लीत पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठीतून संवाद साधत होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी हिंदी भाषेतूनही संवाद साधावा, अशी मागणी हिंदी भाषिक पत्रकारांनी केली. तसेच मराठीतूनच बोलायचं होतं तर मुंबईला पत्रकार परिषद घ्यायला हवी, असा टोला एका पत्रकाराने लावला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित पत्रकाराला कोणताही जाब विचारला नाही अथवा प्रत्युत्तर दिले नाही, अशी टीका त्यावेळी काँग्रेसने केली होती. काँग्रेसनं संबंधित पत्रकार परिषदेतील व्हिडीओचा काही भाग शेअर करत ही टीका केली होती, एका मुख्यमंत्रीपदासाठी अजून किती लाचारी पत्करणार? असा सवालही काँग्रेसने विचारला होता.
तेव्हा काँग्रेसनं आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिले की, सुमारे ५ हजारी मनसबदाराचा दिल्ली दरबारी चांगलाच पाणउतारा चाललाय! महाराष्ट्राचा आणि मराठीचा खुलेआम अपमान सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी तोंडातून चकार शब्द देखील काढला नाही. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राची मान शरमेने अजून किती खाली घालणार? एका मुख्यमंत्रीपदासाठी अजून किती लाचारी पत्करणार?” आणि आता कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर निती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलची पहिलीच प्रत्यक्ष बैठक काल पार पडली. गेल्या वर्षी ही बैठक ऑनलाइन पद्धतीने झाली होती.
दिल्लीत काल झालेल्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह निती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी, २३ मुख्यमंत्री, तीन नायब राज्यपाल, दोन केंद्रीय मंत्री उपस्थित होते. मात्र या बैठकीची महाराष्ट्रात वेगळ्याच कारणासाठी चर्चा झाली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या बैठकीवेळी शेवटच्या रांगेत स्थान मिळाल्याने याबाबतचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि विरोधकांनीही या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला.
Maharashtra CM Eknath Shinde in Last Row Controversy
Politics BJP