नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या महिन्याभरापूर्वी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाल्याने त्याचे पडसाद राष्ट्रीय पातळीवर उमटले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि सेना बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपच्या सहयोगाने नवे सरकार स्थापन झाले. आता बिहारमध्येही राजकीय भूकंप होण्याची दाट चिन्हे आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपवर नाराज असून त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी फोनवर बोलणे केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे नितेश कुमार यांची पुढची वाटचाल काँग्रेस सोबत करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आपल्या देशातील लोकशाही म्हणजे एक प्रयोगशाळा आहे, असे म्हटले जाते. एक काळ असा होता की, संपूर्ण देश जणू काही काँग्रेसमय होता, परंतु आता भारतीय जनता पक्षाने शतप्रतिशत भाजपा असा नारा देऊन गेल्या आठ वर्षांपासून केवळ केंद्रातच नव्हे तर देशभरातील सर्वच राज्यांमध्ये भाजपची सरकार स्थापन व्हावे, यासाठी साम-दाम-दंड-भेद असा नीतीचा अवलंब केला की, काय असे चित्र निर्माण झाले आहे.
आज भारतातील राजकीय वातावरण असे आहे की, भाजपचे एकेक मित्र काही ना काही कारणास्तव दुरावत चालले आहेत. या संदर्भात दोन उदाहरणे नेहमी दिली जातात. एक म्हणजे महाराष्ट्रातील शिवसेना व पंजाबातील अकाली दल. आज हे दोन्ही मित्र पक्ष भाजपच्या विरोधात आहेत. यात जर नितीशकुमार यांची भर पडली, तर हे भाजपला महाग पडेल. त्यामुळे भाजपला ही परिस्थिती सांभाळून हाताळावी लागेल.
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपवर नाराज असलेले नितीश कुमार हे मंगळवारी आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांनी मंगळवारी सर्व खासदारांची बैठक बोलावलेली आहे. यात पाटण्यामध्ये या बैठकीला सर्वपक्षी आमदार खासदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर 11 ऑगस्टपूर्वी बिहारमध्ये एनडीएचे सरकार पडेल आणि नितीश पुन्हा राजदसोबत सरकार स्थापन करतील का? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अलीकडच्या राजकीय घडामोडींमुळे बिहारचे राजकारण तापले आहे.
खरे म्हणजे काही दिवसांपासून नितीश कुमार हे भाजपपासून दूर राहणेच पसंत करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दि. 17 जुलै रोजी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती, परंतु नितीश कुमार या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर दि.22 जुलै रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभात नितीश कुमार यांनाही आमंत्रित करण्यात आले होते, मात्र ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत.
इतकेच नव्हे तर इतकेच दि. 25 जुलै रोजी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी नितीश कुमार यांनाही आमंत्रित करण्यात आले होते, मात्र तेव्हाही ते गेले नाहीत. आजही नितीश कुमार यांना पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बोलावण्यात आले होते परंतु ते या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.
नितीश कुमार यांचा जदयू NDA मधील घटकपक्ष आहे, तर ३ वर्षापूर्वीपर्यंत उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही NDA मधील घटकपक्ष होती. त्यामुळे सत्तासमीकरणे जुळवताना भाजप दोन्हीकडे महत्त्वाचा घटक राहिला आहे. इथेच नितीश कुमार आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीयरीत्या काही साम्यस्थळं दिसून येतात. ही साम्यस्थळं त्या त्या राज्यांच्या संदर्भांनुसार काहीशी बदलतात, मात्र स्थिती सारखी दिसून येते.
उद्धव ठाकरे यांचा शिवसेना आणि नितीश कुमार यांचा जदयू हे दोन्ही पक्ष मूळचे NDA मधील आहेत. त्यापैकी शिवसेना NDA तून बाहेर पडली, तर नितीश कुमार मधले काही वर्षे वगळता पुन्हा NDA मध्येच आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही पक्षांनी ज्यावेळी NDA मध्ये प्रवेश केला, तेव्हा दोन्ही ठिकाणी भाजप कमकुवत होती आणि हे दोन्ही पक्ष ताकदवान होते. मात्र, आताची राजकीय स्थिती बदलली आहे.
नितीशकुमार यांनी २०१५ साली लालूप्रसाद यांच्याशी युती करत बिहारमध्ये ‘महागठबंधन’चा यशस्वी प्रयोग केला. त्यावर्षी बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत अभूतपूर्व यश मिळवले व मे २०१४ मध्ये भाजपच्या उधळलेल्या वारूला लगाम घातला होता. तेव्हापासून नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर नरेंद्र मोदी यांना आव्हान उभे करता येईल, अशी चर्चा सुरू होती. त्यांनी जुलै २०१७ मध्ये ‘महागठबंधन’मधून बाहेर पडत भाजपशी पुन्हा युती केली. या त्यांच्या निर्णयामुळे सर्वांना धक्का बसला होता व त्यांच्यावर विश्वासघाताचा आरोप केला होता. आता परिस्थिती बदलली आहे. नितीशकुमार भाजपशी केलेल्या युतीतून बाहेर पडण्याचा विचार करत आहेत.
Bihar Politial Crisis Nitish Kumar Next Journey
BJP Congress Sonia Gandhi