मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने काढले खरे पण काही तासातच मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळेच १०५ अधिकाऱ्यांपैकी ९ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. असे का करण्यात आले ते अद्याप समोर आलेले नाही. मात्र, यात राजकारण गुंतले असल्याची जोरदार चर्चा आहे.
राज्याच्या पोलिस दलात मोठी खांदेपालट करण्यात आली. त्यात अप्पर पोलिस अधिक्षक दर्जासह पोलिस अधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्याच्या गृह विभागाने काढले. शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेत १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर बदलीचे हे आदेश काढण्यात आले. या बदल्यांकडे सगळ्यांचेच लक्ष लागून होते. एकूण १०९ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात १०५ पोलिस अधिक्षकांचा समावेश होता. मात्र, या आदेशानंतर काही वेगवान घडामोडी घडल्या. त्यामुळेच या आदेशातील ९ अधिकाऱ्यांच्या बदल्या थांबविण्यात आल्या आहेत. तसे स्थगितीचे आदेश काढण्यात आले आहेत. अप्पर पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी काढलेल्या या आदेशानुसार, प्रशांत मोहिते, नम्रता पाटील, संदीप डोईफोडे, दीपक देवराज, सुनिल लोखंडे, प्रकाश गायकवाड, तिरुपती काकडे, योगेश चव्हाण व शर्मिष्ठा वालावलकर या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे.
Maharashtra 9 IPS Officers Transfer Stay