लखीमपूर खिरी (उत्तर प्रदेश) – येथे कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या निदर्शनादरम्यान रविवारी रात्री गोळीबार आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये चार शेतकर्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचे पुत्र आशिष ऊर्फ सोनू आणि त्यांच्या समर्थकांनी शेतकऱ्यांवर वाहने चालविली. या घटनेत चार शेतकर्यांचा मृत्यू झाला असून अनेक शेतकरी जखमी झाल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे. संतप्त शेतकर्यांनी आशिष यांच्या तीन वाहनांची जाळपोळ केली, तसेच काही वाहने उलटवली. पोलिसांनी आशिष मिश्रासह १५ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून, राजकीय पक्षांनी निषेध नोंदविला आहे. शेतकरी नेते राकेश टिकेत पिलभीत येथून लखीमपूरकडे रवाना झाले आहेत. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅरिकेड तोडून ते पुढे निघाले. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि पोलिसांमध्ये रात्रभर लपाछपी सुरू होती. मात्र पोलिस प्रशासनाने त्यांना रात्री ताब्यात घेऊन हरगाव येथील आरोग्य केंद्रात स्थानबद्ध केले होते. प्रियंका गांधी वाड्रा यांना सध्या सीतापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अखिलेश यादव यांना रोखले
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव लखीमपूर खिरीकडे निघाल्यानंतर त्यांना पोलिसांनी रोखले. या वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त केला होता. रोखल्यामुळे समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांसह अखिलेश यादव यांनी धरणे दिले आहेत. बहुजन समाज पार्टीचे नेते सतीशचंद्र मिश्रा यांनाही स्थानबद्ध केल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजप खासदार वरुण गांधी यांनी लखीमपूर खिली घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. हृदयद्रावक घटनेत शहीद झालेल्या शेतकर्यांना श्रद्धांजली. मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी अशी मी मागणी करतो, अशी मागणी वरुण गांधी यांनी केली.
तोपर्यंत अंत्यसंस्कार नाही
लखीमपूर खिरीमध्ये शहीद झालेल्या शेतकर्यांचे मृतदेह ठेवून शेतकरी निदर्शने करत आहेत. जोपर्यंत दोषींना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार नाही, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे.