नवी दिल्ली – महाराष्ट्रातील शाळा आजपासून म्हणजेच दि. ४ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू झाल्या असून शालेय परिसर विद्यार्थ्यांनी गजबजला आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने अनेक ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू होते. परंतु शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल, असे अद्यापही अनेक नागरिकांना वाटते. परंतु शाळा सुरु करण्याचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा खुद्द वर्ल्ड (जागतिक) बँकेने दिला आहे.
जागतिक बँकेने सल्ला दिला आहे की, अनेक देशांना शाळा उघडण्यापूर्वी व्यापक लशीकरणाची प्रतीक्षा करण्याची गरज नाही, कारण वैज्ञानिक पुराव्यातून स्पष्टपणे सूचित होते की, मुलांना कोविड-१९ ची लागण होण्याचा धोका कमी असतो. या संदर्भात जागतिक बँकेच्या शिक्षण संघाने जगभरातील देशांच्या अनुभवावर आधारित एक धोरण अहवाल तयार केला आहे. या अहवालात नमुद केले आहे की, जिथे सावधगिरीने शाळा उघडल्या तेथे विद्यार्थी, कर्मचारी आणि समाजात संसर्ग पसरण्याचा धोका खूप कमी आहे.
या साथ रोगाच्या एक वर्षानंतर आता विषाणू आणि रोग या दोन्हीबद्दल तसेच संक्रमणाचे परिणाम कसे कमी करावे याबद्दल सर्वांना पुरेशी माहिती झाली आहे. लस विकसित होण्यापूर्वी काही देशांनी शाळा पुन्हा उघडल्या त्या देशांच्या अनुभवांकडे पाहता शाळा उघडण्यासाठी व्यापक लशीकरणाची वाट पाहण्याची गरज नाही, त्याशिवाय शाळेत परतणाऱ्या विद्यार्थ्यांची भीती दूर केली गेली पाहिजे.
शाळा बंद ठेवल्याने आजारपणाचा धोका कमी होतो, परंतु मुलांचे शिक्षण, मानसशास्त्रीय आरोग्य आणि सर्वांगीण विकास धोक्यात येतो. शाळा पुन्हा उघडण्याच्या निर्णयासंबंधी आतापर्यंतचा अनुभव दर्शवितो की, शाळा बंद ठेवणे अधिक हानिकारक आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, सध्या जगभरातील ८० टक्के शाळा कार्यरत आहेत. यापैकी ५४ टक्के विद्यार्थी वैयक्तिकरित्या प्रत्यक्ष उपस्थित आहेत. ३४ टक्के विद्यार्थी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये शिक्षण घेत आहेत, तर १० टक्के दूरस्थ (ऑनलाईन) पध्दतीने शिक्षणात सहभागी आहेत.
काही देशात सरकार आणि समाजाला भीती आहे की शाळा पुन्हा उघडल्याने संसर्ग पसरू शकतो, फक्त त्याच ठिकाणी शाळा बंद आहेत. या देशांनी शाळा बंद होण्याच्या नुकसानीचे मूल्यांकन केले पाहिजे, तसेच जागतिक बँक म्हणते की, लहान मुले, विशेषत: दहा वर्षाखालील मुलेही प्रौढ आणि पौगंडावस्थेतील मुलांपेक्षा संसर्गास कमी बळी पडत असतात. म्हणून, त्यांच्यामध्ये संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी आहे. या व्यतिरिक्त, जरी मुलांना संसर्ग झाला तरी त्यांच्यामध्ये मृत्यूचा धोका खूप कमी असतो.